राज ठाकरे यांच्या
भूमिकेमुळे ५६ वर्षांच्या लढ्याचा घोर अवमान; सीमाभागात संताप
महाराष्ट्रात येण्याच्या भानगडीत पडू नका,
झक मारली असे वाटेल!
कर्नाटक सरकार मराठींचा आणि मराठी माणसांचा मान राखणार असेल तर
बेळगाव कर्नाटकात राहिले तरी चालेल!
मुंबई,
दि. १९ (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात सगळेकाही आलबेल आहे असे वाटते काय?
इथे वीज नाही, खड्डे आहेत. प्रत्येक समस्येवर आंदोलनं होताहेत. आधीच १०
कोटी लोक सांभाळणं सरकारला झेपत नाही आहे त्यात आणखी २५ लाखांची भर
कशाला? सीमा भागातील मराठी भाषिकांनी उगाच महाराष्ट्रात येण्याच्या
भानगडीत पडू नये, नंतर झक मारली आणि महाराष्ट्रात आलो असे त्यांना
वाटेल, अशी धक्कादायक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे ५६ वर्षांच्या या लढ्याचा घोर अवमान झाला
असून या आंदोलनावर महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाने गुळण्या टाकल्याची
भावना सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. राज ठाकरे
यांच्या या भूमिकेविरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. सीमा भागात
ठिकठिकाणी निदर्शने करून सीमावासीयांनी आपला राग व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली त्यावेळी
राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली. मात्र त्यामुळे सीमा बांधव संतप्त
झाले आहेत. सीमा प्रश्नाबाबत भावना समजू शकतो, असे सांगतानाच
बेळगावसाठी आंदोलन करण्यापूर्वी या प्रश्नाचा प्रॅक्टीकल विचार करायला
हवा, असे मत राज ठाकरे यांनी मांडले.
सीमा भागातील पंचवीस लाख मराठी माणसांना महाराष्ट्रात घेणं इतकं सोपं
आहे का? उद्या कोकणातले लोक म्हणणार आमच्यावर अन्याय होतोय, मराठवाडा,
विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोकही म्हणणार आमच्यावर अन्याय
होतोय. पुन्हा परप्रांतीयांचे लोंढे आहेतच ते तुम्ही थांबवू शकत नाही
आणि त्यात या पंचवीस लाख लोकांना घ्यायचे? त्याने प्रश्न सुटेल की
चिघळेल?
फुकटच्या सल्ल्याने सीमा बांधव गरगरले
- कोल्हापूर बंद, कर्नाटकच्या बस फोडून काय
होणार? अशाने प्रश्न सुटणार नाही. उलट कानडी लोकांचा राग वाढेल आणि
त्याचा त्रास मराठी माणसांना होईल. सीमा भागासाठी, बेळगावसाठी आणखी किती
काळ आंदोलन करणार?
- सीमा प्रश्न कोर्टात आहे. तिथे जो निकाल लागेल तो लागू द्या. पण
तिथल्या २५ लाख लोकांना महाराष्ट्रात का यायचंय? इथे महाराष्ट्रात काय
सगळं आलबेल आहे? इथेही प्रत्येक प्रश्नावर आंदोलनं सुरू आहेत. त्यात
आणखी यांच्या आंदोलनाची भर पडणार.
- सीमा भागातील मराठी माणसांच्या भावना मी समजू शकतो पण तिथल्या नव्या
पिढीच्या मराठी तरुणाला काय वाटतंय? याचाही विचार करणं आवश्यक आहे.
नाहीतर महाराष्ट्रात येऊन त्यांना पश्चात्ताप होईल. झक मारली आणि
महाराष्ट्रात आलो असंही त्यांना वाटू शकतं.
- सीमा प्रश्नावर व्यवहार्य भूमिका घ्या. तिथल्या मराठी माणसांनी
कर्नाटकचा मान राखावा. सीमा भागातील मराठी माणसांना ते मराठी आहेत
म्हणून अन्याय, अत्याचार होतोय की ते महाराष्ट्रात जाण्यासाठी आंदोलन
करताहेत म्हणून? हे एकदा ठरवा.
- कर्नाटक सरकारने तिथल्या मराठी माणसांना नोकर्यांत सामावून घेतलं,
मराठीचा मान राखला तर कार्नाटकात बेळगाव राहिलं तर हरकत काय? किती काळ
हा इश्यू उगाळत बसणार ?