दिल्ली डायरी – अकाली दलाची भाजपला नकारघंटा

>> नीलेश कुलकर्णी, [email protected]

भाजपसोबतच्या युतीचा फटका अकाली दलाला पंजाबात बसला. अकाली दलाचा सुफडा साफ झाला. आपल्या पक्षाची झालेली वाताहत दिग्गज नेते प्रकाशसिंग बादल यांना आयुष्याच्या संध्याकाळी पाहावी लागली होती. मात्र आता त्यातून अकाली दलाने बोध घेतला आहे आणि भाजपच्या युतीच्या हाकेला नकारघंटा वाजवली आहे. भाजपची भिस्त आता काँग्रेसमधून आणलेल्या बंडखोरांवर आहे.

देशभरात भाजपला अत्यंत अनुकूल वातावरण असून ‘मोदी लाट’ वगैरे आहे, असे भाजपची मंडळी व भक्तमंडळ म्हणत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. अनेक राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपचा घामटा निघाला आहे. त्यामुळेच अकाली दल व बिजू जनता दलासारख्या पूर्वीच्या मित्रपक्षांपुढे भाजपला ‘मैत्रीचा हात’ पसरवावा लागत आहे. मात्र भाजपचा पूर्वानुभव अत्यंत वाईट असल्याने या दोन्ही पक्षांनी युतीस नकार दिल्याने भाजपला एकला चलो शिवाय गत्यंतर उरलेले नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकल्यानंतर पंजाबमध्ये ‘आप’मध्ये घुसखोरी करण्याचे भाजपचे मनसुबे सध्या तरी यशस्वी झालेले दिसत आहेत. आपचे एकमेव लोकसभा खासदार सुशीलसिंग रिंकू यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. अकाली दलाची लढाई पंजाबात भगवंतसिंग मान व दिल्लीत केजरीवालांच्या पत्नी सुनीता हे एकाकीपणे लढत असताना, केजरीवालांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आहेत कुठे? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. चढ्ढांना भाजपने वशीभूत तर केले नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पंजाबात भाजपपुढे आम आदमी पार्टीचे आव्हान आहे. तिथे भाजपचा स्वतःचा बेस नाही. भाजप शहरी भागापुरता मर्यादित पक्ष आहे. एरव्ही अकाली दलाच्या खांद्यावर बसून पंजाबात भाजपचे राजकारण इतकी वर्षे तिथे चालले. मात्र आता अकाली दलाने भाजपला खांद्यावरून जमीनवर आणल्यामुळे भाजपला ‘प्लॅन बी’नुसार काँग्रेसची पह्डापह्डी करावी लागली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या पत्नी परनीत काwर व लुधियानाचे खासदार रवनीत बिट्टू भाजपच्या गळाला लागले आहेत. परनीत यांचे भाजपमध्ये जाणे आश्चर्यकारक अजिबात नाही. मात्र ज्यांनी पंजाबसाठी खलिस्तानींच्या गोळ्या छातीवर झेलून हौतात्म्य पत्करले त्या माजी मुख्यमंत्री बिआंतसिंग यांचे नातू रवनीत बिट्टू यांनी भाजपमध्ये जाणे काँग्रेससाठीच नाही तर पंजाबच्या राजकारणासाठीही धक्कादायक आहे. आजोबांप्रमाणेच रवनीत हेदेखील कट्टर राष्ट्रभक्त आहेत. त्यांच्या याच गुणवैशिष्टय़ाचा राजकीय फायदा उचलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. रवनीत यांच्यासह परनीत हे निवडून येणारे उमेदवार भाजपने आपल्या जाळ्यात ओढले आहेत. गुरुदासपूरमधून सनी देओल ऐवजी दुसऱ्या एखाद्या नटाला आजमावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. चार सौ पारचा नारा देणे सोपे आहे. मात्र त्याची गोळाबेरीज करता करता भाजपचे चाणक्य दिल्लीच्या मुख्यालयात घामाघूम झाले आहेत हे नक्की.

महुआंचे काय होणार?

तृणमूल काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोइत्रा यांच्या मागे केंद्रीय सरकार हात धुऊन मागे लागले आहे. महुआंनी लोकसभेत फेव्हर घेऊन प्रश्न विचारल्याचे आरोप कथितरीत्या सिद्ध झाल्यामुळे त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यानंतर महुआंची फाईल बंद होईल, असे वाटले होते. मात्र दिल्लीतल्या चाणक्यांच्या इशाऱ्यानुसार महुआंची दुसरी फाईल उघडली गेली आहे. सीबीआयने समन्स बजावूनही महुआ चौकशीसाठी हजर न राहिल्याने त्यांना ऐन निवडणुकीतच अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संकटे जेव्हा येतात तेव्हा ती एकटीदुकटी येत नाहीत, ती चहूबाजूंनी येतात. महुआ त्याचा सध्या अनुभव घेत आहेत. एकतर महुआ लढत असलेल्या मतदारसंघातून भाजपने राजघराण्यातल्या अमृता रॉय यांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवले आहे. रॉय यांच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी एक ‘व्हर्च्युल रॅली’देखील केली. त्यावरून भाजपसाठी ही जागा किंवा महुआंना पराभूत करणे किती निकडीचे व तातडीचे काम आहे, हे लक्षात यावे! महुआंचा विषय लोकपालांकडे गेला. लोकपालांच्या आदेशाचा बहाणा करून महुआ यांचा पुरता ‘बंदोबस्त’ करायचा हाच एकमेव उद्देश केंद्रीय सरकारचा आहे. अदानी घोटाळ्याला महुआंनी लोकसभेत वाचा पह्डली होती. त्याची जबर किंमत त्यांना सध्या मोजावी लागत आहे.

महताब, तुम्हीसुद्धा?

लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट आहे असे त्यांचे भक्त म्हणत असले तरी, देशात एक लाट जरूर आहे, ती म्हणजे दलबदलूंची. देशातील तमाम इतर पक्षांतील लुच्चे, लफंगे, बदमाश, वाँटेड नेते भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मधून ‘पवित्र’ होऊन बाहेर पडत आहेत. या नवश्यांच्या जत्रेत बिजू जनता दलाचे अभ्यासू नेते भर्तृहरी महताब हेही सामील झाले, हे पाहून काहीसे आश्चर्य वाटावे अशी स्थिती आहे. लोकसभेत मोदी लाटेनंतर विद्वान खासदारांची तशी वानवाच राहिलेली आहे. त्यातही भर्तृहरी महताब यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण भाषणांनी व अभ्यासू वर्तनाने आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केलेली आहे. लेखक, संपादक असलेल्या भर्तृहरी यांचे वडील दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते. बिजू जनता दलासोबत भाजपची अनेक वर्षे युती होती. 2009 मध्ये हा घरोबा संपला. नवीन पटनायक यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता मिळवली. नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. मात्र केंद्रीय सत्तेत त्यांनी कधीच रस दाखविला नाही. पक्षात दुसरी फळी निर्माणही होऊ दिली नाही. अनेक ज्येष्ठ नेत्यांना केंद्रीय सरकारमध्ये सामील न होण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेऊन नवीनबाबूंनी मोठे होऊ दिले नाही, असा एक आरोप त्यांच्यावर होतो. ते करणाऱ्यांमध्ये भर्तृहरीदेखील आहेत. चार पाच वेळा ते कटकमधून निवडून आले. मात्र केंद्रीय सत्तेत त्यांना सहभागी होता आले नाही. इतकेच नाही तर भाजपने देऊ केलेले लोकसभेचे उपसभापतीपद देखील पटनायक यांनी अव्हेरले. पटनायक हे सध्या राजकारणाच्या निर्णायक टप्प्यावर आहेत. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून मध्यंतरी एका दाक्षिणात्य प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव पुढे आले होते. त्यामुळे पक्षात चांगलीच अस्वस्थता पसरली होती. मात्र आता नव्या माहितीनुसार पटनायक यांचे पुतणेच पुढचे वारसदार असतील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच पुढचा रागरंग ओळखून भर्तृहरी यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यासाठी त्यांना त्यांचे पूर्वाश्रमीचे यारदोस्त जय पांडा यांचीही मदत झालीय. राजकारणातल्या बजबजपुरीत महताब यांच्यासारख्या विद्वानांनीसुद्धा पक्षबदल करावा, हे धक्कादायक आहे.