>> आसावरी जोशी
१४-१५ सप्टेंबर रोजी रशियात हिंदुस्थान – रशिया राजनैतिक संबंध स्थापनेच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन रशियामध्ये करण्यात आले आहे. या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ५० वर्षांपूर्वी रशियन भाषेत भाषांतरित, प्रकाशित झालेल्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यकृतींचे मॉस्को राज्य विद्यापीठाच्या माध्यमातून पुनर्प्रकाशन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अण्णाभाऊंवर लिखाण करण्याची संधी आपसूक मिळाली.. आणि त्यांच्याविषयी माहिती, उपलब्ध साहित्य संदर्भाकरिता वाचायला घेतले. अण्णांवर विपुल साहित्य वाचायला मिळाले.. पण अण्णांच्या प्रत्येक उत्तुंग कार्याला जातीयवादाची, त्यांच्यावर असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावालाही कुठेतरी जातीयवादाची किनार दिली गेली आहे. समाज सुधारणेसाठी.. स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारी ही व्यक्तिमत्वे फार दुर्मिळ असतात.. आणि त्यांनी त्यांच्या कार्याने आभाळभर उंची गाठलेली असते.. त्यामुळे अण्णांच्या विचारांना कोणत्याही चौकटीत बांधता येऊ शकत नाही..किंबहुना बांधूही नये. अण्णांनी जो अन्याय सोसला.. तो त्यांनी आपल्या साहित्यातून व्यक्त केला आणि तोच अन्याय इतरांवर होऊ नये यासाठी ते आयुष्यभर झटले..हा त्यांच्या कार्यातील समाजवादाचा एक भाग झाला.. स्वातंत्र्यलढ्यातही अण्णांचा सहभाग होता.. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील त्यांचा सहभाग.. मुंबई राखण्यासाठी त्यांच्या जीवाची होणारी काहिली कोणीच विसरू शकत नाही.. या अशा अस्मितेच्या लढ्यात जेव्हा जे जे उतरतात तेव्हा ते जातपात पाहून उतरत नाहीत तर देशासाठी.. समाजासाठी ते त्यांची बांधिलकी मानतात म्हणून अशा लढ्यांत सर्वस्व झोकून देतात..
तुकाराम भाऊराव साठे. जातीभेदांमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित रहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्व. या समाजावर ब्रिटीशांनी गुन्हेगार समाज म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूलतेत गेले. कुरुंदवाड संस्थानातील वाटेगावात अण्णांचा १ ऑगस्ट १९२० रोजी जन्म झाला. अण्णांची आई वालबाई साठे दोर वळण्याच्या कामाला जात तर वडील भाऊराव साठे मुंबईत पोटापाण्यासाठी राहत असत. अण्णांचे वडील बागकामात आणि शेतीत अत्यंत तज्ञ होते. परिसरात चोरी झाली.. दरोडा पडला की पोलीस लगेच अण्णाभाऊंच्या वस्तीत येऊन तेथे राहणाऱ्या लोकांची धरपकड करायचे.. अशावेळी घरातील बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपून बसायच्या. अण्णांच्या वडिलांना अण्णांनी खूप शिकावे असे वाटे. १४ व्या वर्षी अण्णा प्राथमिक शाळेत गेले. त्यांना अक्षरे नीट गिरवता येत नसल्याने गुरुजींनी त्यांना उजव्या हाताची बोटे सुजेपर्यंत मारले. दुसऱ्या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला.. मला वाटते अन्यायाविरुद्ध बंड करून उठण्याचे बीज त्यांच्या मनात येथेच रुजले.. या प्रसंगानंतर दोन दिवसातच अण्णांनी शाळेकडे पाठ फिरवली ती कायमची..
छंदांतून शिक्षण – लहानपणापासून अण्णांना विविध छंद होते.. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा. दांडपट्टा चालवण्यात त्यांचा हात धरणारे कोणीच नव्हते.. डोंगर, दऱ्या, राने, नद्या हा निसर्ग अण्णांच्या विशेष आवडीचा.. पक्षी निरीक्षण , शिकार, मध गोळा करणे या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी.. याशिवाय रानात भटकणे, पोहणे, विविध पक्ष्यांशी मैत्री करणे, पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधून काढणे यातून अण्णा निसर्गाच्या खूप जवळ पोहोचले होते. जत्रांमध्ये भटकणे हाही अण्णांचा आवडीचा छंद . हे भटकणे व्यर्थ नव्हते.. त्याला त्यांनी पाठांतर आणि निरीक्षणाची जोड दिली.. विविध लावण्या, लोकगीते, पोवाडे, कवने पाठ करणे ते इतरांना ऐकवणे.. पोवाडे टीपेच्या आवाजात इतरांना ऐकवणे या छंदांमुळे गावातील लोकांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती जमलेला असे.
स्वातंत्र्यचळवळीत उतरण्याची प्रेरणा – रेठ्या गावाच्या जत्रेत क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण अण्णांनी ऐकले.. ते भाषण अण्णांना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेले. क्रांतीसिंहांच्या चळवळीत सामील होऊन अण्णांनी लोकनाट्यात त्यांनी कामे केली.. पुढे अकराव्या वर्षी अण्णा आई – वडिलांसोबत मुंबईत आले. ही मुंबईतील वर्षे अण्णांसाठी वैचारिक जडणघडणीची ठरली. येथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचं विशाल जग त्यांना जवळून पाहायला, अनुभवायला मिळाले.. मुंबईतील एक वर्षं त्यांनी फक्त एकच ध्येय समोर ठेवले .. शिकण्याचे. नातलगांच्या तोंडून त्यांनी रामायण, हरिविजय, पांडवप्रताप हे ग्रंथ फक्त ऐकून तोंडपाठ केले. या साऱ्या वातावरणातून अण्णांवर साम्यवादाचा प्रभाव पडला. त्यांच्या हरहुन्नरी स्कवभावामुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते हवेहवेसे झाले. अण्णांनी हमाली, बूट पॉलीश, घरगडी, खाणकामगार अशी विविध कामे केली. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या पाट्यांवरील अक्षरे जुळवीत ते साक्षर झाले. यातूनच त्यांना वाचनाची आवड लागली.
अण्णांनी आपले संपूर्ण आयुष्य माटुंग्यातील चिरागनगर झोपडपट्टीत काढले. येथेच त्यांच्या हातून अनेक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.. ते म्हणायचे “आपण कोणत्याही वस्तीत राहत असलो तरी आपले मन स्वच्छ असावे..” पुढे अण्णांना मुंबई सोडून पुन्हा आपल्या गावी जावे लागले आणि ते चुलत भावाच्या तमाशाच्या फडात सामील झाले. येथे अण्णांनी या लोककलेचा संपूर्ण चेहरामोहराच बदलून टाकला. तमाशाला प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रतिष्ठा अण्णांनीच मिळवून दिली. त्यांनी तमाशाला लोकनाट्यात रुपांतरीत केले आणि त्याचा वापर स्वातंत्र्यलढ्यात, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुरेपूर केला. अण्णा आपल्या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे. तमाशाला त्यांनी नवे रूप दिले.. पहिल्या नमनात मातृभूमी, हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा उल्लेख होऊ लागला.. यातूनच त्यांनी या लोककलांना लोकशिक्षणाकडे वळविले. यातूनच अण्णांचे साहित्य इंग्लिश, रशियन, फ्रेंच, झेक इ. भाषांमध्ये अनुवादित झाले. पुलंनी त्यांचे तीन पैशाचा तमाशा हे नाटक अण्णांना समर्पित केले होते.
अण्णांचा रशिया प्रवास – १९४८, १९६१ साली त्यांनी रशियाला जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. ते रशियाला जाणार हे जेव्हा लोकांना समजले तेव्हा मात्र संपूर्ण महाराष्ट त्यांच्या पाठीशी उभा राहीला. ते रशियाला जाण्यापूर्वीच त्यांची चित्रा कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. त्यांनी गायलेले शिवचरित्र रशियन भाषेत अनुवादित झाले.. त्यांचा स्टालीनग्राडचा पोवाडा रशियात चांगलाच लोकप्रिय झाला. सुलतान, फकीरा, या कादंबऱ्या रशियात चांगल्याच गाजल्या. आज पुन्हा रशियात अण्णांच्या आठवणी जागविल्या जात आहेत.. खऱ्या अर्थाने जाती धर्माच्या सीमा ओलांडून अण्णांचे स्वप्न आज काही अंशी का होईना साकार होत आहे.