सीमाभागातील परिस्थिती 48 तासांत सुधारली नाही तर तेथील मराठी बांधवांना धीर देण्यासाठी मी स्वतः बेळगावात जाईन
‘‘गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. त्याला वेगळे वळण देण्याचे काम केले जात आहे. राज्याच्या सीमेवरील परिस्थिती गंभीर बनली आहे. महाराष्ट्राने संयम पाळला आहे, पण त्यालाही मर्यादा आहेत. येत्या 24 तासांत हे हल्ले थांबले नाहीत तर महाराष्ट्राचाही संयम सुटेल आणि नंतर कुणी कायदा हातात घेतला तर त्याला केंद्र आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल,’’ असा थेट इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिला. सीमा भागातील परिस्थिती 48 तासांत सुधारली नाही तर तेथील मराठी बांधवांसाठी मी स्वतः बेळगावात जाईन, असा पवित्राही त्यांनी घेतला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर महाराष्ट्रातील वाहनांवर कानडी गुंडांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज सिल्व्हर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद बोलवली होती. त्यात त्यांनी या घटनांवर तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. ज्यांनी संविधान लिहिले, सार्वभाषिक लोकांना समान अधिकार दिला त्या पुण्यमहात्म्याचे अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करण्याच्या दिवशीच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर घडलेला प्रकार निषेधार्ह असल्याचे शरद पवार म्हणाले. सीमा वाद गेल्या आठवडय़ापासून एका वेगळ्या स्वरूपात नेण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे. त्यांनी थेट जत आणि अक्कलकोटवर दावा सांगितला. ते सातत्याने जी भूमिका घेत आहेत व जो भाषाप्रयोग करत आहेत. त्यामुळे सीमा भागातील स्थिती गंभीर झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.
दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून अपेक्षाभंग
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण तसे झाले नाही. आता वाद चिघळत चालला आहे. सीमेवरील परिस्थिती निवळावी म्हणून दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले पाहिजे होते. दोन्ही राज्यांच्या प्रमुखांकडून त्याप्रश्नी चर्चा होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे काहीही होताना दिसत नाही, असे पवार म्हणाले.
सीमाभागांतील मराठी भाषिकांमध्ये दहशत
सीमावर्ती भागातील मराठी बांधव आपल्या संपका&त असल्याचे सांगत शरद पवार म्हणाले की, बेळगावात आज जे घडले ते निषेधार्ह आहे. मी गेली अनेक वर्षे सीमा प्रश्न जवळून बघितला आहे. माझा या गोष्टीचा अभ्यास आहे. मला स्वतःलाही लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे सीमावर्ती भागात काही घडले की तेथील लोक माझ्याशी संपर्क साधतात. माझ्याकडे जी माहिती आली ती अतिशय चिंताजनक आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी केली जात आहे. कार्यालयाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अगदी निवेदन देण्यासही मज्जाव केला जात आहे. कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या मराठी लोकांना हा त्रास दिला जात आहे. त्यामुळे मराठी नेत्यांनी येऊन धीर देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बोम्मईंपूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी असे कधीच केले नाही
बोम्मई यांच्याकडून जी भूमिका सातत्याने मांडली जातेय ती कर्नाटकातील यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांकडून कधीच घेतली गेली नाही याची आठवण करून देतानाच, बोम्मईंच्या डोळ्यासमोर आगामी निवडणूक आहे की काय हे कळत नाही, असे शरद पवार म्हणाले. लोकशाहीत निवडणूक हे सर्वच जण लढवत असतात. परंतु माणसा-माणसांमध्ये, भाषिका-भाषिकांमध्ये कटुता वाढणे हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कुणी असे करत असेल तर ते निषेधार्ह आहे, असेही पवार यांनी ठणकावून सांगितले.
….कर्नाटक सरकार कायदा हातात घेतेय
महाराष्ट्राची भूमिका ठरवताना ती एका पक्षाची नाही, तर तिथे महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र आले पाहिजेत. याबाबत पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या व न्यायालयीन लढाई करण्याचा निर्णय आम्ही सगळय़ांनी घेतला. आता ते प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयात भूमिका मांडण्याची संधी दोन्ही बाजूच्या सरकारांना आहे. मात्र कायदा हातात घेण्याचे काम कर्नाटक सरकारकडून होत आहे. याचा अर्थ न्यायव्यवस्थेवरही विश्वास नाही हे कळत-नकळत भासवण्याचा कर्नाटकचा प्रयत्न आहे, असाही आरोप शरद पवार यांनी या वेळी केला.
जत, सोलापूर हे आताच कसे उद्भवले
जे काही गुजरातच्या सीमेवर झाले, जे काही सोलापूरच्या सीमेवर झाले, जे काही जतच्या सीमेवर झाले त्या गोष्टी आताच कशा उद्भवल्या, असा प्रश्नही या वेळी शरद पवार यांनी उपस्थित केला. सोलापूरचा आठ वर्षे पालकमंत्री असताना माझ्या काळात असा प्रश्न कुणीही मांडला नव्हता. आता कुणीतरी जाणीवपूर्वक चिथावणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि दुर्दैवाने राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतली आहे, असा हल्लाबोलही शरद पवार यांनी केला. त्या भागांतील लोकांच्या समस्या असतील तर त्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील खासदारांनी गृहमंत्री शहांची भेट घ्यावी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई जर चिथावणीखोर भूमिका घेत असतील तर तो देशाच्या ऐक्यासाठी मोठा धोका आहे. त्यामुळे याप्रकरणी केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, असे शरद पवार म्हणाले. उद्यापासून संसदेचे अधिवेशन सुरू होत असून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी केंद्रीय गृह मंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालावी, अशी माझी त्यांना विनंती राहील, असेही पवार यांनी नमूद केले.