
बेळगाव जिल्ह्यातील राजहंस गडावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या कार्यक्रमात हजेरी लावल्याबद्दल छत्रपती संभाजीराजेंना महाराष्ट्र एकीकरण समितीने एक पत्र लिहिले आहे. सीमावासियांनी विनंती करून देखील या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानं छत्रपती संभाजी राजेंविरोधात समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रात ‘छत्रपतींचं नाव घेऊन मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती’, असं सांगण्यात आलं आहे.
‘मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्या काठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला’, याची आठवण देखील पत्रातून करून देण्यात आली आहे.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात झाली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष करून प्रसंगी कारावासही भोगल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आणि याच संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतीच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे, असं म्हणत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून छत्रपती संभाजीराजेंना लिहिण्यात आलेले पत्र पुढील प्रमाणे;
आपण रविवार दिनांक 5 मार्च 2023 रोजी किल्ले राजहंसगड बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या अनावरण कार्यक्रमास हजर झाला त्याबद्दल सीमा वासियांच्या भावना इथे व्यक्त करीत आहे. मराठी भाषेसाठी गेली 66 वर्ष मराठी माणूस निरंतर लाठ्या काठ्या झेलत संघर्ष करत आला आहे. अनेक लोकांनी जीवाचे बलिदान देऊन हा संघर्ष तेवत ठेवला. राजहंस गडावर शिवमूर्तीची जी प्रतिष्ठापना करण्यात आली या पाठीमागे व त्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी होती. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीने आपणास या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती केली होती. कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्या विरोधात मराठी माणसाने वेळोवेळी संघर्ष केला. प्रसंगी कारावासही भोगला. त्या संघर्षाचा संदर्भ देत आपणास त्या कार्यक्रमास हजर न होण्याची विनंती करण्यात आली होती. आम्ही आजवर छत्रपतीच्या गादीचे वारस म्हणून तुम्ही आमच्या सोबत आहात असे मानत होतो. परंतु आमच्या ह्या समजाला तुम्ही हरताळ फासला आहे. तुमच्या उपस्थितीतच महाराष्ट्रातील आमदार देशमुख यांनी ‘जय कर्नाटक’ असे उद्गार काढले. आपण पतीचे वारस म्हणवता तर मराठी विरोधी या घटनेचे आपण साक्षीदार होऊन सीमा वासियांच्या आदरास पात्र ठरत आहात. मराठी माणसाच्या लढ्याला तुम्हाला बळ देता येत नसेल तरी तुमच्याकडे आमचा आग्रह नाही पण ज्या छत्रपतींचे नाव घेऊन सीमाभागात मराठी माणूस लढतो त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम आपण करू नये ही विनंती. बेळगावतील मराठी माणसाचा लढा हा छत्रपतीच्या रयतेचा आहे. आपण त्याचे पाईक मानले जाता तरी कृपया मराठी माणसाचा आपण घात करू नये अशी सीमा भागातील जनतेची इच्छा आहे. कोल्हापूरकर जनतेने नेहमीच बेळगावकर जनतेची पाठराखण केली. आपण आपली भूमिका कोल्हापूरच्या जनतेसारखी ठेवाल अशी अपेक्षा. नाहीतर कोल्हापूरकर जनतेची आणि तुमची नाळ तुटली आहे काय? अशी शंका येण्यास वाव मिळतो. छत्रपतीच्या विचाराचे आम्ही वारस आहोत त्यांच्या नावाने आम्ही लढा देत आहोत. आम्ही नक्कीच विजयी होणार आहे. तुम्ही नामच्या सोबत बावे ही श्री चरणी प्रार्थना कळावे.
आपला
प्रकाश आप्पाजी मरगाळे
खजिनदार, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव