संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन; चंद्रपूरमध्ये मुल पोलीस ठाण्यात तक्रार

chandrapur

विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने संभाजी भिडे यांच्या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील मुल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली.

‘महाराष्ट्र हा प्रगतशील पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात सर्व जाती-धर्म व पंथाचे लोक गुण्यागोविंदाने मिसळून राहतात, त्यातच महात्मा ज्योतिराव फुले बहुसंख्य लोकांचे आदर्श असून त्यांना मानणारा बहुसंख्य समाज महाराष्ट्रात वास्तव्यास आहे, महाराष्ट्र मध्ये काही दिवसापासून महापुरुषांच्या बदनामीचा जणू ठेकाच घेतल्याप्रमाणे संभाजी भिडे हे महापुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून सारखं अवमान करत आहेत’, असा आरोप करण्यात आला आहे.

‘काही दिवसांपूर्वी अगोदर महात्मा गांधी यांच्या विषयी त्यांनी गरळ ओकली होती. समाज सुधारक राजाराम मोहन रॉय व महाराष्ट्रात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी अत्यंत खालच्या शब्दांमध्ये आक्षेपार्ह विधाने करून महापुरुषांचा अवमान केलेला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा महाराष्ट्रातील बहुसंख्य वर्गाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा काम केल्या जात आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीला व मानसिकतेला लगेच आटोक्यात आणणे गरजेचे आहे’, अशी मागणी करण्यात आली. पुढे बोलताना ‘मुख्यमंत्री आपणास विनंती आहे की संभाजी भिडे यांना त्वरित अटक करण्यात यावी. तसे न झाल्यास महाराष्ट्रातील तमाम बहुसंख्य वर्ग रस्त्यावरून त्या विरुद्ध मोठें आंदोलन करेल’, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. राकेश गावतुरे समता परिषदेचे प्रा. विजय लोणबले, ज्येष्ठ नेते प्रा. रामभाऊ महाडोळे, शशिकलाताई गावतुरे, देवराव ढवस गंगाधर कुनघाळकर, डॉ. पद्माकर लेनगुरे राकेश मोहूर्ले डेव्हिड खोब्रागडे, मनीष मोहूर्ले, मोरे सर, ओमदेव मोहूर्ले, ईश्वर लोणबले, मनोज मोहरले, रोहिदास वाढई, प्रतिक गुरूनूले, पवन गुरूनूले, मंगेश मोहुले, प्रतिक आसमवार, यांनी सहभाग नोंदविला होता.