मंथन – सोशल मीडियावरील राजकीय विखार

>> समीर गायकवाड

आपल्या बहुआयामी विचारांवर ताबा मिळवून केवळ एका सीमित विश्वात जगण्यासाठी सोशल मीडिया आपला वापर करतं. ‘उकडीचे मोदक भारी की तळणीचे मोदक भारी’, ‘नाशिकची मिसळ ग्रेट की ठाणे, पुण्यातली मिसळ ग्रेट’, असे शेकडो कोल्ड वॉर्स इथे जारी असतात. त्यातून नकळत द्वेष, मत्सर पाझरतो. सोशल मीडियावरील वावर एकांगी विचारांकडे झुकत राहिला तर आपल्या विविधांगी विचार करण्याच्या कुवतीचा ऱ्हास होतो आणि विद्रुप झालेली अभिव्यक्ती उरते!

सोशल मीडियावर सातत्याने केवळ राजकीय भूमिका मांडणाऱया मंडळींना त्याचा स्ट्रेसदेखील येत असतो. तब्येतीवर त्याचे साधकबाधक परिणामही होतात. अनेकांच्या अकाली अकस्मात जाण्यात या गोष्टी हातभार लावतात. मागील काही वर्षांत अशी अनेक मित्रमंडळी पाहिली आहेत. इथे राजकीय वादविवाद अधिक करत राहिलं वा सातत्याने तशाच पोस्टवर अधिक व्यक्त होत राहिलं की, अल्गोरिदमनुसार आपल्या फीडमध्ये तशाच पोस्ट्स अमाप येत राहतात. मग माणूस आपल्या आवडीनिवडी, आपले छंद, आपली सर्वंकष बौद्धिक भूक विसरून एकरेषीय प्रकटनाच्या सापळ्यात अडकू लागतो. चित्रे, शिल्पे, पुस्तके, सिनेमे, साहित्य, विज्ञान, अध्यात्म, अधिभौतिक तत्त्वे, निसर्ग, पर्यावरण, प्रवास, खाद्य संस्कृती, वस्त्र्ाांची दुनिया, जीवनाशी निगडित असणाऱया नवरसांच्या विविध घटकांना पोषक असं खाद्य देणारे अनेक घटक इथे असतात. मात्र माणूस केवळ राजकीय पोस्ट्सच्या सापळ्यात अडकत जातो. त्याचे विश्व संकुचित करण्याचे काम सोशल मीडिया करतो.

जर आपण कडवट भूमिकांचे समर्थन करत असू तर आपल्या फीडमध्ये केवळ अशाच पोस्ट्स येत राहतात आणि आपल्यातील विषाला ते पोषक ठरते. हे टाळण्यासाठी जे केवळ अत्यंत कडवे, कट्टर राजकीय भूमिकांसाठी इथं वावरत असतात अशांच्या यादीतून आधी रजा घेणं क्रमप्राप्त होय. असं करताना काही आपल्याला बाजूला काढतात, तर काहींना आपण रजा द्यावी लागते. मग आपल्या फीडमधील गोष्टीही आपसूक बदलत जातात. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बदलू शकतो. मात्र त्यासाठी आवश्यक त्या गोष्टींशी आपला संपर्क वाढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विविध परस्परविरोधी विचारांचे विस्तृत नि अभ्यासू विचार वाचनात आले की, त्यांचा नेमका अन्वयार्थ लागतो. उदाहरणार्थ, आपण जर कट्टर ‘अबक’प्रेमी असू आणि आपल्या मित्रयादीत सगळेच तसे लोक असले तर आपली फीड तशाच पोस्ट दाखवते. सगळीकडे तेच सुरू आहे असे आपल्याला वाटू लागते. दुसरी बाजूच आपल्यासमोर येत नाही. मग कट्टर ‘अबक’विरोधी लोक काय लिहितात, त्यांचे विचार काय आहेत, त्यांच्या भूमिकेस कोणते आधार आहेत हे जाणून घेतल्याशिवाय आपल्या विचारांत बदल संभवत नाही. आपल्या मित्रयादीत सर्व जातीधर्माचे, सर्व राजकीय विचारधारांचे, सर्व जाणिवांचे लोक असले की, आपल्यासमोर विविधांगी पोस्ट्स येत राहतात. आपलं वैचारिक संतुलन राहण्यास त्याने मदत होते.

अनेकांना आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी रिकामी डोकी हवी असतात. ही डोकी आयटी सेलने भडकवलेल्या भावनांवर चालणारी असतात. फुरसतीच्या वेळेसाठी इथे आलेली माणसं सुरुवातीला कंड वा हौस म्हणून राजकीय भूमिका मांडतात आणि नंतर ते पूर्णवेळ राजकीय समर्थक होऊन जातात. त्यांच्या आयुष्यातील इतर अनेक चांगल्या आवडीनिवडींचा बट्टय़ाबोळ होऊन जातो. माणूस निव्वळ राजकीय विकृतीने पछाडला जातो. त्याच्या यादीतले बहुतांश सगळेच असे असतात. मग जळीस्थळीकाष्ठाrपाषाणी त्याला राजकीय भूमिका दिसू लागतात. आपला विवेक त्याने गामवलेला असतो. मात्र पुढे जाऊन स्वतःच्या आकलनशक्तीचेदेखील आकुंचन केलेलं असतं. राजकीय भूमिका मांडणारे इथे अनेक पेड लॉक्स आहेत, त्यांना निदान फुटक्या कवडीचे आमिष तरी आहे! बाकीच्यांचे काय? मात्र पेड आयटी सेल्सच्या नादी लागून आपल्या सर्जनशील अभिव्यक्तीचे नि जडणघडणीचे अतोनात नुकसान करून घेणाऱया लोकांच्या हाती काय लागते? मेंटल स्ट्रेस, नैराश्य आणि अतिआक्रमकता, वैचारिक साचलेपण आणि बौद्धिक अधोगती यांचे ते शिकार होतात. खेरीज समाजाकडे बघण्याचा सच्चा नजरिया नकळत हरवून जातो. इथे अनेक छुपे लोक असेही आहेत की, जे स्वतः आरामात, मजेत, आनंदात जगतात; टिवल्याबावल्या करत अनेकांच्या पोस्ट्सवर राजकीय शेरेबाजी करतात, इतरांना उसकवतात नि स्वतः मात्र थंड राहतात, नंतर मजा घेत राहतात! तर काही लोक असेही आहेत की, जे लिहिणाऱयाला खतपाणी घालत राहतात. त्यांच्या भिंतीवर काहीच नसते, अगदीच शोध घेतला तर एखादा डीपी बदललेला फोटो दिसतो! यांच्या आयुष्यात काहीच नसतं. हे दुसऱयाचं आयुष्य खराब करणारे लोक असतात.

मुळात सोशल मीडिया हा निव्वळ राजकीय अजेंडा म्हणून जे जे लोक वापरतात, त्यांच्यापासून आपण दूर जात राहिलं की, आपल्यातला सोशलनेस खऱया अर्थाने बाहेर येतो. ज्यांचं पोटच अजेंडय़ावर चालतं, त्यांचं आपण समजू शकतो. मात्र आपलं काय? आयुष्यातील अनेक घटकांचा आनंद हवा असेल, जीवनातील अनेक अनुभूतींचा आस्वाद घ्यायचा असेल तर एकरेषीय वा एकांगी भूमिकेतून तो कधीच साध्य होत नाही. याचा अर्थ असा नाही की, आपल्याला राजकीय विचार नसावेत वा राजकीय विचार मांडले जाऊ नयेत. ‘मी तटस्थ असतो वा मला राजकीय भूमिका नाही’ हेदेखील एक राजकीय ढोंग असते. इथल्या ट्रोल्सपायी घाबरून अनेक जण आपली भूमिका मांडू शकत नाहीत हे समजू शकतो. मात्र जेव्हा जेव्हा आत्यंतिक प्रकटनाची गरज पडते तेव्हा आपली भूमिका सौम्य नि नेटक्या शब्दांत मांडली तरी आपल्याला कणा असल्याचे समाधान लाभते.

चोवीस तास निव्वळ राजकीय मोडमध्ये असणाऱया द्वेष, मत्सराने ग्रासलेल्या लोकांपासून दूर राहिलं की, आपल्या जाणिवा समृद्ध होण्यास मदत होते, नकळत स्वतःमध्येही डोकावता येते. केवळ अशांच्या पोस्ट्सवर जाणं हे स्वतःचा ऱहास करण्यासारखं आहे. हे लोक कोण आहेत याची साधी चाचणी घेता येते. आपण राजकीय, धार्मिक भूमिका न मांडता फक्त अन्य विषयांचीच मते मांडायची वा तशा पोस्ट्सवरच व्यक्त व्हायचे, हे लोक आपल्यापाशी फिरकतदेखील नाहीत. मात्र अधूनमधून केवळ एखादी राजकीय पोस्ट केली की, हे लगेच हजर होतात. कारण त्यांची पोस्ट्स फीडच तशी असते.

यावरून लक्षात घ्या की, आपल्या बहुआयामी विचारांवर ताबा मिळवून केवळ एका सीमित विश्वात जगण्यासाठी सोशल मीडिया आपला वापर करतं. आत्मसन्मान गमावलेल्या ट्रोल्सना काही दिडक्यांची हाडे मिळतात, राजकीय लबाडांना घबाड मिळतं. मात्र त्यांच्या मागे धावणाऱया युजर्सना काय मिळतं? माणसं केवळ राजकीयदृष्टय़ा खुजी होताहेत असंही नाही. सोशल मीडियावर होणारे कथित वाददेखील सामाजिक, जातधर्मीय आणि भाषा, प्रांत अभिनिवेशास पोषक असेच असतात. ‘उकडीचे मोदक भारी की तळणीचे मोदक भारी’, ‘नाशिकची मिसळ ग्रेट की ठाणे, पुण्यातली मिसळ ग्रेट’, ‘पुणेकर अधिक हुशार की मुंबईकर अधिक हुशार’, ‘एमपीएससीवाले हुकलेले की आयटी सेलवाले माजलेले’, ‘देऋब्रा विरुद्ध कोब्रा’ असे शेकडो कोल्ड वॉर्स इथे जारी असतात. त्यातून नकळत द्वेष, मत्सर पाझरतो. सोशल मीडियावरील वावर एकांगी विचारांकडे झुकत राहिला तर आपल्या विविधांगी विचार करण्याच्या कुवतीचा ऱहास होतो आणि विद्रुप झालेली अभिव्यक्ती उरते! कीबोर्ड आपल्या हाती आहे, आपण काय करायचेय हे आपल्यालाच ठरवायचेय.

 [email protected]