
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत बच्चू कडू यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. याआधीही मंत्रइमंडळाचा विस्तार होत नसल्याने बच्चू कडू यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत त्यांनी इशारेही दिले आहेत. आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा होत आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्या विधानाची चर्चा होत आहे.
जेवणाचं आमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. मंत्री झालो नाही तरीही कामं करतोय. मंत्री झालो तर वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला पाहिजे. विस्तार तातडीने झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे, ही जनतेची मागणी आहे, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. सरकार स्थापन झाल्यानंतर बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळेल, असं सर्वांना वाटत होतं. पण बच्चू कडू यांना अद्याप मंत्रीपद मिळालेले नाही. मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबाबत बच्चू कडू यांनी स्वत:ही अनेकदा उघड वक्तव्ये केली आहेत. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांनी वकत्व्य केले आहे.