कडू डोस, मुनगंटीवारांना खाजवायलाही नखे राहिली नाहीत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाघनखं हिंदुस्थानात आणण्याच्या नावाखाली निवडणुकांच्या तोंडावर राजकारण करून पाहणाऱ्या भाजप नेत्यांना आमदार बच्चू कडू यांनी ‘कडू’ डोस दिला. ‘सुधीरभाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं तर आणलीच नाहीत. पण आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत’, असा टोला आमदार कडू यांनी सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांना लगावला.

वाघनखं आणण्यासाठी मुनगंटीवार हे  50-60 लाख रुपये खर्च करून इंग्लंडला गेले. हे मला काही आवडलं नाही. हे काम फोनवरूनही करता आलं असतं. मोदीजी डिलीटल इंडिया म्हणतात आणि आमचे मंत्री तिथे व्यक्तिशः जातात आणि मोकळ्या हाताने परत येतात. सुधीरभाऊंनी असं करावं, हे चुकीचं आहे. ते मोठे देशभक्त मंत्री आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.

वाघनखं लुटूनच आणू

दोन-तीन वर्षांसाठी वाघनखं उसनवारीवर आणणे, ही त्यांच्या डोक्यातील कल्पनाही चांगली आहे. मला वाटतंय आम्हीही तुमच्याबरोबर येतो, आपण वाघनखं लुटूनच आणू, असंही बच्चू कडू म्हणाले.