
किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बाबतचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत.
किल्ले रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 जून ते 7 जून या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने गडावर विविध सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विविध भागातून मोठ्या संख्येनी शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत गडावर दाखल होणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मुंबई गोवा महामार्गावरील तसेच वाकण पाली खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.
31 मे रोजी रात्री 12 वाजेपासून 2 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत तर 4 जूनला रात्री 12 वाजेपासून ते 6 जूनला रात्री 12 वाजेपर्यंत या दोन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत महामार्गावरून 16 टन आणि त्याहून अधिक क्षमतेचे ट्रक, कंटेनर, मल्टी अँक्सल व्हेईकल, ट्रेलर्स, रेती आणि खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
दूध, इंधन, गॅस, औषध पुरवठा, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नसणार असल्याचे शासन आदेशात नमुद करण्यात आले आहे.