प्रेमिकेला भेटण्यासाठी गावाची बत्ती गुल केली, पुढे काय झालं ते वाचा…

प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना बिहारमध्ये घडली असून येथील एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी संपूर्ण परिसरातील गावाची बत्ती गुल करत होता. प्रेयसीसोबत प्रेमाचे रंग उधळता यावेत आणि ते कोणाला दिसू नयेत यासाठी ते वीज कापत होता.सुरेंद्र राय असे या तरुणाचे नाव आहे.

सुरेंद्र हा बिहारमधील कृत्यानंद नगर येथील दहेरीया येथील रहिवासी आहे. इथल्याच एका आदिवासी तरुणीशी मागील पाच वर्षापासून त्याचे प्रेमसंबंध सुरू आहे. सुरेंद्र जेव्हा कधी त्याच्या प्रेयसीला भेटायला जात असे, तेव्हा तो गावाची वीज 3 तासांसाठी कापत होता. या दरम्यान हे प्रेमी युगल गावात अनेक ठिकाणी मनाला वाटेल तसे वावरत आणि प्रेमसंबंध प्रस्थापित करत होते. अनेकदा गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थ खूप त्रस्त झाले होते. त्यांनी वारंवार वीजपुरवठा खंडीत होण्यामागचं कारण शोधलं तेव्हा त्यांना सुरेंद्रच वीज गुल करत असल्याचं कळालं.

दररोजच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी सुरेंद्रला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. सुरेंद्रने 9 ऑक्टोबर रोजी गावाची वीज गुल होताच ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी सुरेंद्रला प्रेयसीसोबत गावाबाहेर आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. यानंतर दोघांचे केस कापले आणि चपलांचा हार घालत गावभर फिरवले. यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत या दोघांचे लग्न लावून दिले आणि नंतर रिक्षाने सुरेंद्र आणि त्याच्या प्रेयसीला घरी पाठवून दिले. या घटनेविरोधात सुरेंद्र किंवा इतर कोणीही पोलिसात तक्रार नोंदवली नाही. दरम्यान, सुरेंद्रची ही लव्ह स्टोरी सध्या तेथील परिसरात मोठा चर्चेचा विषय बनली आहे.