
बैलांची शक्ती वाढावी यासाठी त्यांना चाऱ्यासोबत घास या नावाचे गवत खायला दिले जाते. हे घास गवत पचनास खूप जड, गरम आणि चिकट असते. या गवतातील स्निग्धतेमुळे ते अत्यल्प प्रमाणातच बैलाला खायला द्यायचे असते. एका वेळेस एक लहान पेंढी पुरेशी असते. ही पेंढी गव्हाणीत टाकतांना एकदम विस्कटून द्यायला लागले. बैलाला एका वेळेस फार तर चार – पाच काड्या उचलता येतील अशा पद्धतीने ती द्यावी लागते. बैलाला जास्त भुक लागली असल्यास तो घाई – घाईत खायला लागतो. त्यात जर घास गवताच्या एकदम दहा – बारा काड्या तोंडात घेऊन गिळल्यास, त्याचा दुष्परिणाम होतो.
घास गवतासह इतर चारा भरभर खाल्ल्याने बैलाला वाताची समस्या निर्माण होते. वात तयार झाला की बैल अस्वस्थ होऊन त्याचे पोट फुगयला लागते, यात बैलाचा मृत्यू पण होऊ शकतो. पोटफुगी आजाराचे विशिष्ट लक्षण म्हणजे उदराच्या भागात फुगोटी होय. काही पशुपालक गाय- म्हैस व्याल्यानंतर जास्त दूध मिळावे म्हणून त्यांना जास्त पिष्टमय पदार्थयुक्त, प्रथिनयुक्त चारा, कोंडा, शेंगदाणा व सरकी पेंड खाऊ घालतात. सोयाबीनचे व तुरीचे भुसकट, मुगाचा व उडदाचा वाळलेला पाला जनावरांस प्रमाणाबाहेर दिल्यास मलावरोध होऊन पोट फुगते. केवळ लुसलुशीत हिरवी वैरण किंवा प्रथिनयुक्त हिरवा चारा प्रमाणाबाहेर खाऊ घातल्यासही पोटफुगी उद्भवते. उन्हाळ्यात उपासमार झालेली जनावरे पावसाळ्यात उगवलेले हिरवे, कोवळे, लुसलुशीत गवत अधाशीपणे खातात व पोटफुगीस बळी पडतात.
वरील आजारावर उपाय म्हणून बैलाला किंवा इतर जनावरांना पण तेल पाजले जाते. त्यामुळे बैलाला ढेकर येतात, किंवा पातळ शेण पडून आराम पडतो. यावर चंदरज्योति नावाचे एक झाड असते. त्याची लहान फांदी एका बाजूने बैलाच्या तोंडात घातल्यास, ती चघळायला सुरवात केली, तरी पोटफुगी कमी व्हायला सुरवात होते. कोरा या प्रश्नोत्तरांच्या मंचावर निवृत्त वायुसैनिक आणि वस्तु सेवा कर अधिकारी एकनाथ वाघ यांनी हे उत्तर दिले आहे.