गुरं-ढोरं बसतात त्याच पाण्याने भागवतात तहान, पाण्याविना कोंडाणा ग्रामस्थांची दुर्दशा

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

गावाच्या विकासाचं गोड स्वप्न उशाशी घेऊन गाव झोपी जातं. किमान मूलभूत सुविधांची सोय झाली असावी, या आशेत डोळे चोळत गाव जाग होतं. हे चित्रं तसं रोजचच. पण काहीच बदललेलं नसतं. या साऱ्याला वैतागून एक थकलेली महिला म्हणते, आमच्यापेक्षा गुराढोरांचे जगणं बरं. एखाद्या कथेतील, कादंबरीतील हा उतारा नाही. एका तहानलेल्या गावाचं भयाण वास्तव आहे. दिवसभर, रात्रभर ज्या डबक्यातील पाणी गुरढोर पितात, जनावर पितात. त्याच डबक्यातील पाण्याने तहान भागवण्याची दुर्दैवी वेळ एका गावावर ओढवली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातल्या मागासलेला भाग अशी ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील कोंडाणा हे लहानसे गाव. धाबा ग्रामपंचायतीत हे गाव येतं. गावाला जाण्यासाठी नीट रस्ताही नाही. गावातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्त्यालगतचे नाले तुडुंब भरलेले आहेत. पण ठेच लागली तरी मार्गाने चालत जाऊ. घाण सहन करू, मात्र किमान प्यायला शुद्ध पाणी द्या, अशी मागणी हे ग्रामस्थ करत आहेत.

या गावात नळ योजना पोहोचली आहे. धाबा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून गावाला पाणीपुरवठा होतो . मात्र ही योजना महिन्यातून दहा पंधरा दिवस बंदच असते. नळांना पाणी आलं तर ते एकतर गढूळ असतं, काही नळाना पाणी पोहोचत नाही. अशा स्थितीत गावकरी एक किमी अंतरावर असलेल्या नाल्यातील डबक्याचे पाणी आणतात. या डबक्याभोवती कुंपण नाही.

दिवसाउजेडी आणि रात्रभर या डबक्यातील पाणी गुरंढोरं पितात. मोकाट कुत्री या डबक्यात बसतात. जंगली जनावरंही येथील पाण्याने तहान भागवतात. पहाटे याच डबक्यातील पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करतात. अख्ख गाव या डबक्यातील पाण्याने तहान भागवत. गावात नळ योजना कार्यान्वित होण्याच्या पूर्वी याच पाण्याने गावकरी तहान भागवायचे. आता नळ असले तरी तीच वेळ गावावर ओढवली आहे.