मोबाईल बॅटरीचा विस्फोट होऊन बालकाचा मृत्यु, जालन्यातील भोकरदन तालुक्यातील घटना

मोबाईल बॅटरीचा विस्फोट होऊन दहा वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावा जवळील एका वाडीत घडली आहे. समर्थ परशुराम तायडे (10) असे मृत बालकाचे नाव आहे. भोकरदन शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जालना रोडवरील कुंभारी येथे गणेश दांडगे यांच्या तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी झाला. कार्यक्रम आटोपून 4 मार्च रोजी तायडे कुटुंब आपल्या मुळ गावी आमठाणा येथे परतणार होते. मात्र चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर समर्थ बोलत होता. त्याच वेळी मोबाईलचा स्फोट झाला व या स्फोटामुळे त्याच्या कानाला व हाताच्या बोटाला गंभीर जखम झाली. यात बालकाचा मृत्यू झाला असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मृत घोषित केले. सदरील घटनेमुळे संपुर्ण परीसरात हळहळ वक्त होत आहे. घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आला आहे. दरम्यान तायडे कुटुंबाची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने समर्थ याचे वडील हात मजुरी करत आहे. ज्या ठिकाणी काम मिळाले त्या ठिकाणी ते काम करत आहे. घटनेची नोंद भोकरदन पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.