ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करा – मंत्री बच्चूभाऊ कडू

जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्रामविकासाला चालना देण्याची सूचना राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज रेडवा येथे दिली.

जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमीपूजन राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आज त्यांनी चांदुरबाजार तालुक्यातील रेडवा या सीमावर्ती गावातील रस्ता बांधकामाचे लोकार्पण केले. अडगाव, विचोरी, तळेगाव, विष्णोरा, खेड, सायवाडा, गणेशपूर, चिचकुंभ ते राज्यसीमेपर्यंत हा रस्ता तयार करण्यात आला आहे. या कामासाठी 2 कोटी 8 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

चांदुरबाजार पंचायत समितीच्या सभापती वनमाला गणेशकर, रेडवाचे सरपंच अश्विन मालवीय, चिचकुंभच्या उपसरपंच फुलवंती पानेकर, चांदुरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख, पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले तसेच रेडवाचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

ग्रामस्थांना गावातच सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. रेडवा ते घाटलाडकीपर्यंतचा रस्ता तयार झाल्यामुळे ग्रामस्थांना दळण-वळण करणे सुलभ होणार असल्याचे समाधान कडू यावेळी व्यक्त केले. येथील माता जगदंबा संस्थानासमोरील जागेत खुले सभागृह बांधकामाचे भूमीपूजनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस राज्यमंत्री कडू यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषद शिक्षिका, अंगणवाडी सेविका यांनी राज्यमंत्र्यांना गावात आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवेदन दिले. पाणीपुरवठा, घरकुलाचे प्रश्न, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे व सुधारणा आदींबाबत कडू यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली.