महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरल्याचं म्हणत मुंबईतील वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. यासंदर्भात ट्वीट केलं आहे.
सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये केंद्र सरकारकडून वस्त्र आयुक्त रूप राशी यांना लिहिलेलं पत्र जोडलं आहे. या पत्रात वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात येत असल्याचा उल्लेख आहे. त्यावरून सचिन सावंत यांनी भाजपचं धोरण महाराष्ट्रविरोधी असल्याची टीका केली आहे.
‘महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग/ प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता 1943पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे’, असा आरोप त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.
१/२ महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग/ प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे. pic.twitter.com/FiMgohNyyM
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 21, 2023
राज्यातील सत्ताधारी भाजप नेत्यांवरही त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून टीकास्त्र सोडलं आहे. ‘ मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. महाराष्ट्राला मागे सारणे हा 12 कोटी मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहेच पण देशासाठीही घातक आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांवर केली आहे.