भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक व्हावी या मागणीसाठी 23 एप्रिलपासून देशातील पैलवान आंदोलन करत आहेत. एक महिना उलटून गेल्यानंतरही सरकारकडून काही ठोस आश्वासन अथवा आंदोलनाची दखल न घेतली गेल्याने आंदोलक आक्रमक झाले. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
महिन्याभरपासून आंदोलन करूनही त्याची सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे पैलवानांनी रविवारी नवीन संसद भवनासमोर निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी धरपकड करून आंदोलन दडपले. पैलवानांच्या आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्ष सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरद्वारे टीका केली आहे.
25 अंतरराष्ट्रीय मेडल लाने वाली बेटियां – सड़कों पर न्याय की गुहार लगा रहीं!
2 FIR में यौन शोषण के 15 घिनौने आरोपों वाला सांसद – प्रधानमंत्री के ‘सुरक्षा कवच’ में महफ़ूज़!
बेटियों के इन हालात की ज़िम्मेदार मोदी सरकार है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2023
25 आंतरराष्ट्रीय पदके जिंकून आणणाऱ्या मुली रस्त्यावर उतरून न्यायासाठी याचना करत आहेत. 2 एफआयआरमध्ये लैंगिक छळाचे 15 गंभीर आरोप असलेले खासदार – पंतप्रधानांच्या ‘सुरक्षा कवच’मध्ये सुरक्षित आहेत. मुलींच्या या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये केला आहे.
पैलवानांचे आंदोलन दडपण्याऱ्या सरकार आणि पोलिसांवर टीका होत आहे. विविध राजकीय पक्षांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधानानी आरोप असलेल्या खासदाराला सुरक्षा कवच दिले आहे. त्यामुळे पैलवानांच्या या परिस्थितीला सरकारच जबाबदार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.