
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जोरदार हल्ला चढवला. रविवारी (02 जानेवारी) रोजी झालेल्या एका सभेवेळी त्यांनी सांगितले की, ‘योगी सरकारने पाच वर्षांत केवळ स्मशानभूमी बांधल्या आणि मोठ्या प्रमाणात तेथे पोहोचण्याची व्यवस्थाही केली होती.’
लखनौ येथे आयोजित महासभेत केजरीवाल यांनी संबोधित करताना उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आणि राज्याच्या अर्थपूर्ण विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला एकदा संधी द्या, असे आवाहन राज्यातील जनतेला केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवत केजरीवाल म्हणाले, 2017 मध्ये देशातील भाजपचे सर्वात मोठे नेते आले होते आणि म्हणाले होते की, उत्तर प्रदेशमध्ये कबरस्तान बांधली जात असतील तर स्मशानभूमीही बांधली पाहिजेत. खेदाची बाब म्हणजे गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केवळ स्मशान घाट बांधले. केवळ स्मशानभूमीच बांधली नाही, तर कोरोना महामारीच्या काळात राज्यातील ढिसाळ व्यवस्थापनामुळे मोठ्या संख्येने लोकांना स्मशानभूमीत नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
त्यांनी योगी सरकारवर आरोप केला की, “योगी सरकारने कोविड-19 महामारीच्या काळात ज्या प्रकारे कोविड-19 चे व्यवस्थापन केले, त्यामुळे या राज्याची संपूर्ण जगात थू-थू झाली.” जगभरात कोरोना काळात कुठे अव्यवस्था पाहायला मिळाली असेल तर ते राज्य उत्तर प्रदेश आहे. एवढे वाईट व्यवस्थापन होते की त्यावर पांघरूण घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारला अमेरिकेतील मासिकांमध्ये 10-10 पानांच्या जाहिराती देऊन जनतेच्या कष्टाचे कोट्यवधी पैसे खर्च करावे लागले.’
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी शाळा आणि रुग्णालये बांधण्यासाठी येतो. मी ते दिल्लीत बांधून आलो आहे. तसेच उत्तर प्रदेशातही बनवून देईन. विरोधी पक्षांना हे सगळे कसे करायचे हेच कळत नाही. फक्त स्मशानभूमी आणि स्मशानभूमीच बांधता येते. पण आता देशाला शाळा आणि रुग्णालयांची गरज आहे.’
केजरीवाल म्हणाले की, योगी सरकारच्या जाहिरातप्रेमाची स्थिती अशी आहे की दिल्लीत दिल्ली सरकारचे फक्त 106 होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत, तर योगी सरकारचे 850 होर्डिंग्ज आहेत. ते उत्तर प्रदेशात निवडणूक लढवत आहेत की दिल्लीत हेच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशातील प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची शपथ मी घेतली आहे आणि त्यामुळेच आज दिल्लीतील सरकारी शाळाही देशात उदाहरण बनल्या आहेत, असे केजरीवाल म्हणाले.
विरोधी पक्षांवर आरोप करताना ते म्हणाले, 75 वर्षात या पक्षांनी जाणूनबुजून देशाला गरीब आणि अशिक्षित ठेवले जेणेकरून आपण त्यांच्या सभांना जात राहिलो. सरकारी शाळांची जाणीवपूर्वक दुरवस्था झाली. दिल्लीतील सरकारी शाळा पाच वर्षांत दुरुस्त केल्या, तर उत्तर प्रदेशात त्या दुरुस्त झाल्या नसत्या का?
300 युनिट मोफत वीज, 10 लाख तरुणांना रोजगार आणि 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या आश्वासनांचा पुनरुच्चार करत केजरीवाल यांनी आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाला एक संधी द्यावी, असे आवाहन केले.
ते म्हणाले, ‘तुम्ही सर्व पक्षांचा अनुभव घेतला आहे. सपा, बसपा, भाजप आणि काँग्रेसला भरपूर संधी दिली. आम्हाला पाच वर्षे संधी द्या. त्यानंतर तुम्हाला ते आवडले नसेल तर मतदान करू नका.’