बीड जिल्ह्यातील जलजीवनमधील भ्रष्टाचारावर धनंजय मुंडेंचा प्रहार

बीड जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका करत, सरकारला धारेवर धरले. जलजीवन मिशनचे घरोघरी स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यात सुमारे 1265 कामे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून लक्षवेधीमध्ये ज्या कामांची तक्रार करण्यात आली आहे, त्यांचे टेंडर किती टक्के अबोव्हने देण्यात आले, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

जिल्ह्यात सध्या सुमारे 1265 कामे सुरू आहेत, एवढी कामे सुरू असताना पाणी पुरवठा विभागास 65 कर्मचारी अपेक्षित असताना केवळ 15 लोक कार्यरत आहेत, त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, जेणेकरून नियमानुसार सुरू असलेल्या कामांवर परिणाम होणार नाही, अशी मागणीही यावेळी धनंजय मुंडे यांनी केली.

अनेक कामे ठराविक एजंसींना दिल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे एकाच एजन्सीला जास्त कामे दिल्याने कामांमध्ये बिलंब व अन्य तक्रारी संभवतात, एकूण कामांमधील किती कामे कोणत्या एजंसींना देण्यात आलीत, याची माहिती देणार का? असा सवाल उपस्थित करत मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. सध्या जलजीवन मिशन मधील कामांमध्ये तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व सुरू असलेल्या कामांचे एखाद्या नामांकित थर्ड पार्टी एजन्सीकडून ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही मुंडे यांनी केली. कामाच्या टेंडरिंगमध्ये राजकीय व्यक्ती व कंत्राटदार यांचा हस्तक्षेप होत असल्याच्या अनेक तक्रारी असून, अशा स्वरूपाच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे पुराव्यांदाखल असल्याचेही धनंजय मुंडे यांनी नमूद केले. या प्रकरणी चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.