
शेतातील आले पिकावर कीटकनाशक फवारणी करत असताना नाकातोंडातून पोटात गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. ही घटना सातारा तालुक्यातील यवतेश्वर येथे घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
युवराज पोपट पवार (वय 35, रा. यवतेश्वर, ता. सातारा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. युवराज पवार हे नोकरीसोबत शेती करत होते. यवतेश्वर येथील आंबा नाकाच्या शिवारात त्यांनी आल्याची लागवड केली आहे. बारा दिवसांपूर्की या आल्याच्या पिकावर क्लोगार्ड नावाचे कीटकनाशक त्यांनी फवारले. त्याकेळी त्यांना फारसे काही जाणवले नाही.
मात्र, त्याच रात्री तीनच्या सुमारास त्यांना उलटय़ांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल केले. हळूहळू कीटकनाशक त्यांच्या संपूर्ण शरीरात भिनल्यामुळे त्याचा दुष्परिणाम त्यांच्या मेंदूवर झाला. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बारा दिवसांनंतर त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. साताऱ्यातील तहसील कार्यालयामध्ये ते स्टॅम्प वेंडर म्हणून काम करत होते. सातारा तालुका पोलीस ठाण्यात त्यांचे भाऊ अमर पवार यांनी खबर दिली असून, पोलीस नाईक मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.