लातूरात व्यापाऱ्यावर हल्ला, चाकूचा वार करून अंगठा तोडला; पावणे दोन लाखांसह मोबाईल पळवला

दुकान बंद करून घराकडे परतणाऱ्या व्यापाऱ्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी हल्ला चढवला. हल्लोखोरांनी चाकूचा वार करून व्यापाऱ्याचा अंगठा तोडला. तसेच 1 लाख 80 हजार रुपयांची रोकड आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा ऐवज पळवून नेला. लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री ही घटना घडली. मदन गंगाधरराव बीदरकर (रा. वैभव नगर, लातूर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली.

फिर्यादी गांधी मार्केट येथील दुकान बंद करून रात्री साडे आठ वाजता दुचाकीवरुन घराकडे परत जात होते. उड्डाणपुलावर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा युवकांनी त्यांना हाक मारली. पाठीमागे वळून पाहिले असता एकाने त्यांच्या दुचाकीला लाथ मारली आणि त्यांच्या जवळील पैश्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी चाकूने त्यांच्या हातावर वार केला. यामध्ये त्यांच्या आताचा अंगठा तुटला. यानंतर आरोपींनी पैश्याची बॅग आणि मोबाईल घेऊन पोबारा केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.