
विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱया कॉंग्रेसच्या सात आमदारांवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज ही माहिती दिली. पक्षात बेशिस्त अजिबात खपवून घेणार नाही असे बजावतानाच कोणत्या आमदारांवर कारवाई झाली आणि काय कारवाई झाली हे लवकरच कळेल असे वेणुगोपाल म्हणाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस, खासदार के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा या वेळी घेण्यात आला.
क्रॉस व्होटिंग करणाऱया आमदारांचा अहवाल नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना पाठवला होता. त्यासंदर्भातही आजच्या बैठकीत बोलताना वेणुगोपाल यांनी कोणत्याही परिस्थितीत पक्षशिस्त मोडू देऊ नका अन्यथा कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाही असे स्पष्ट शब्दांत बजावल्याचे समजते.
z 20 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी केली जाणार असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून याच दिवशी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाईल असे पटोले यांनी सांगितले.
महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार
महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागा वाटपाची चर्चा करणार आहेत. या विधानसभा निवडणुकीत राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून उखडून फेकू, असा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केला, असे वेणुगोपाल म्हणाले. राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेसचा संकल्प असल्याचे वेणुगोपाल म्हणाले. भाजपने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठय़ा प्रमाणात गैरवापर केला, पण तरीही त्यांचा पराभव झाला. भाजपचा अयोध्येनंतर बद्रीनाथमध्येही जनतेने पराभव केला आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनताही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.