रत्नागिरीत दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यातून थोडक्यात बचावला

फाईल फोटो

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरुन पानवलजवळ एका दुचाकीस्वारावरावर अचानक बिबट्याने झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने दुचाकीस्वर बचावला आहे. सचिन बेंद्रे सकाळी रत्नागिरीत कामानिमित्ताने आले होते. त्यांना काम आटपून घरी जाण्यास उशीर झाला होता. मित्रांची भेट घेऊन रात्री ते जाकादेवीकडे निघाले. त्यांची दुचाकी पानवल येथील चांदसूर्या वळणावरुन पुढे जात होती.

त्यांची दुचाकी चांदसूर्या वळणावर आल्यावर बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बेंद्रे यांच्या गाडीमागे एक चारचाकी गाडी येत होती. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे सर्वाजण घाबरले होते. मात्र, चारचाकी वाहन आणि लोकांचा राबता दिसल्यामुळे बिबट्याने तेथून पळून गेला.त्यामुळे सचिन या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. सुदैवाने बिबट्याच्या हल्ल्यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

चांदसूर्या हा भाग महामार्गावरच असल्यामुळे वाहनांची ये-जा असते. त्या ठिकाणी काळोख असतो. बाजूलाच जंगल असल्यामुळे कोणताही वन्य प्राणी रस्त्यावर आला तर त्याचा अंदाज येत नाही. दरम्यान, या परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी स्थानिक लोकांना बिबट्या दिसला होता. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.