झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे! महाविकास आघाडीचे आमदार सरकारविरोधात आक्रमक

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा मंगळवारी पंधरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार निदर्शने केली.

‘झोपलेलं सरकार जागं होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे…’, ‘बळीराजाला मदत करा नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे… ‘, ‘उद्योग चालले बाहेर, वाढती बेरोजगारी… सरकारा गुढी घरी उभारु का शेजारी?… ‘, ‘वाढवला गॅस, महागाई केवढी… अवकाळी पाऊस, विस्कटली घडी…’, ‘सरकारा कशी करु खरेदी? कशी उभारु गुढी?… ‘ अशा घोषणा देत आणि बॅनर फडकवून व हातात गुढी घेऊन महागाई, अवकाळी पाऊस, या विषयावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात हल्लाबोल केला.