
40 हजार मते पडणं हे एका सामान्य घरातील लेकीसाठी महत्त्वाचे आहे. झाशीची राणी लढली, तसे मला लढायचे आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी दिली. राज्यभर चर्चा झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. या निकालानंतर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
40 हजार मते मिळणे ही सामान्य घरातील लेकीसाठी विशेष आहे. माझ्या घरात कधी कोणीही सरपंचही झाले नाही. पण पाच जिल्ह्यातून 40 हजार मते मिळत असतील तर जनतेचे आभार आहेत. मी शिवसैनिकांचे आभार मानते, महाविकास आघाडीचे आभार मानते. झाशीची राणी लढली तसं मला लढायचे आहे. यात जुन्या पेन्शन योजनेचा पराभव, विनाअनुदानित शिक्षकांचा पराभव झाला, लढणाऱ्या शिक्षकांचा पराभव झाला. ज्यांनी 15 वर्ष म्हणजेच तीन टर्म काय हे सगळ्यांना माहित आहे, आता वारशाने काय करणार याकडे तुमच्यासह माझे डोळे लागले आहेत. माझ्या मावळ्यांना, भाऊ आणि बहिणींना सोबत घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे. मी शिवसेनेला कधीच सोडणार नाही. मी शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकच राहणार.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे विजयी झाले. सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरी अखेर 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. तर शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली आहेत. या चुरशीच्या लढतीत सत्यजित तांबे 29 हजार 465 इतक्या मतांनी विजय मिळवला. या निकालानंतर पाटील यांनी प्रतिक्रिया देत झाशीची राणी लढली, तसे मला लढायचे आहे, असे म्हटले आहे.