
मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून अडचणीत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारची धावपळ सुरू आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असून दुसरीकडे धनगर समाजाचेही आंदोलन सुरू आहे. यामुळे कोंडीत अडकलेल्या राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन केली आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा अशी मागणी सुरू आहे. यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून आता राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 9 सदस्यांची समिती गठित केली आहे. मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली आहे. तीन महिन्यांच्या आत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे. ‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.