
सत्यजीत तांबे प्रकरणावर राज्यात चर्चा सुरु आहे. सत्यजीत तांबे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. यात सत्यता आणि वस्तुस्थिती काय आहे, यावरून जनतेत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. चूक झाली असेल तर कारवाई करावी. मात्र, विनाकारण, कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असे मत काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवर यांनी व्यक्त केले आहे.
विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबत वड्डेटीवार म्हणाले, थोरातांचा राजीनामा हा दुर्दैवाची बाब आहे. मात्र, राजीनामा मान्य करायचा की नाही, हा पक्ष श्रेष्ठींचा निर्णय आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपच्या गडात आम्ही विजय मिळवला आहे. अमरावती विधानपरिषदेची जागा गृहित धरली नव्हती, तरी लोकांनी निवडून दिलं. विदर्भ हा भाजपाचा गड होता. लोकांनीच त्याला सुरुंग लावण्याचे काम केलं. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने आणि आपापसात ताळमेळ ठेऊन काम केले पाहिजे, असेही विजय वड्डेटीवार म्हणाले.