
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाची खाज सुटली आहे, असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले होते. त्यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाले असून त्यांनी तानाजी सावंत यांना माफी मागण्यास सांगितले आहे.
”तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना जर तारतम्या बाळगावे. काय बोलताय तुम्ही, भानावर आहात का तुम्ही, जर आमच्या भूमिकेसाठी काही करता येत नसेल तर किमान विरोध करू नका. आज जी आपण आमच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्यासाठी आधी आमच्या समाजाची माफी मागा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.
”तुमचे सरकार आले म्हणून तुम्ही बिनबुडाचे आरोप करत सुटला आहात.य मराठ्यांना खाज आली आहे, एवढं बोलण्यापर्यंत तुमची मजल गेली आहे. सत्तेची हवा एवढी ड़ोक्यात जाऊ देऊ नका. आम्ही एससी मधून कधीच आरक्षण मागितले नाही ना भविष्यात कधी मागणार, त्यामुळे तुम्ही असली विधानं करून आपली पत घालवू नका. ज्यावेळी तुम्ही गुवाहटीला पळून गेलात तेव्हा आम्ही तुमच्या बाजूने होतो. त्यामुळे तुम्ही सुखासुखी सरकार स्थापन करू शकलात., जर हा मराठा तुमच्या विरोधात गेला असता तर तुम्हाला कुणी जगू दिलं नसत. जर तु्म्हाला काही माहित नसेल तर त्यावर बोलू नका, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.