
दहावीचा निकाल लागून जवळपास 1 महिना होत आला. मात्र अद्याप अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल होण्याची पहिली, दुसरी नाही तर ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक गोंधळले आहेत. वेळापत्रकात बदल करण्यामागे संस्थाचालकांची खेळी असल्याचे बोलले जात आहे. महाविद्यालयांची प्रवेश क्षमता पूर्ण होत नसल्याने वेळापत्रकात बदल करण्यात येत नाही ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार अकरावी प्रवेशाच्या जवळपास 8 लाख जागा शिल्लक राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकरावी प्रवेशासाठी राज्यातील 9 हजार 435 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 21 लाख 23 हजार 40 जागा उपलब्ध आहेत. मात्र प्रवेशासाठी 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे तब्बल 8 लाख 51 हजार जागा रिक्त राहणार असल्याने अनुदानित खासगी शाळांमधील अंदाजित दहा हजारांहून अधिक शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त होतील, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. अनेक महाविद्यालयांना आवश्यक तेवढे प्रवेश न मिळाल्यास त्यांची मान्यता धोक्यात येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे संस्थानिहाय कोटय़ा अंतर्गत प्रवेश मिळवण्याची मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या 6 लाख 72 हजार, वाणिज्य शाखेच्या साडेपाच लाख तर विज्ञान शाखेच्या 8 लाख 70 हजार जागा उपलब्ध आहेत. राज्यातील 527 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मेदेखील अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे खासगी संस्थाचालक ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची मागणी करताना दिसत आहेत.
n अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी (कॅप राउंड) 10 जूनला प्रसिद्ध होणार होती. मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार तब्बल 16 दिवसांनी म्हणजेच 26 जूनला ही यादी प्रसिद्ध होणार आहे.
n 17 जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेशाचे परीक्षण होणार आहे. पहिल्या यादीनंतर 27 जून ते 3 जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राउंड अंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी 5 जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
n शालेय शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार आणि वेळेचे भान न ठेवता घेतल्या जाणाऱया निर्णयामुळे प्रवेशाची पारदर्शकताच धोक्यात आली आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकांतील सततच्या बदलांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
अकरावी प्रवेशाचे नवे वेळापत्रक
अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप ………………………. 11 जून
शून्य फेरीतील प्रवेश प्रक्रिया ………………………………. 12 ते 14 जून
नियमित फेरी 1चे वाटप ………………………………………………. 17 जून
नियमित फेरी प्रवेश जाहीर करणे …………………………………… 26 जून
प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेणे ………………………….. 27 ते 3 जुलै
नियमित फेरी 2साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे ……… 5 जुलै