महाराजांनी पाठीत खंजीर खुपसला नव्हता! लोढांच्या विधानावरून आनंद परांजपेंची टीका

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून स्वत:ची सुटका करून रयतेचे राज्य स्थापन केलं होतं. पण, त्यांनी कधीच आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला नव्हता. त्यामुळे हिंदुत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झालेल्यांची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली जात असेल तर ते महाराष्ट्र सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मिंधे गटाच्या गद्दारीची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना केली. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. लोढा यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आनंद परांजपे म्हणाले की, सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे इतिहासातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपचे नेते करीत आहेत. आग्रा येथून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी सुटका केली. या ऐतिहासिक प्रसंगाची तुलना भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील गद्दारीशी केली आहे. मंगलप्रभात लोढा हे जरी संविधानिक पदावर असले तरी महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती, शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनात असलेली आस्था या बद्दल मला शंका आहे, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली आहे.

महाराजांनी आदिलशाही, निजामशाही, मोगल या तिन्ही सत्ताधीशांच्या विरोधात लढाया करून रयतेचे, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पण, हे घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्रातून पळाले आणि सुरतला गेले. सुरतहून गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरून गोव्याला गेले आणि नंतर महाराष्ट्रात परतून मुख्यमंत्री झाले. त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा माणसाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे याच्यापेक्षा घाणेरडे राजकारण या महाराष्ट्राने पाहिलेले नाही. म्हणून मंगलप्रभात लोढा यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असे खडेबोल परांजपे यांनी सुनावले आहेत.