राज्यात दरदिवशी एक पेपर फुटतो आहे, एसआयटी चौकशीची विरोधकांची मागणी

राज्यात पेपरफुटीचे सत्र सुरू आहे. दरदिवशी कुठे ना कुठे पेपर फुटतो आहे. सरकार पेपरफुटीला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. पेपरफुटीला प्रोत्साहन देणाऱया सरकारचा धिक्कार करत राज्यात विविध विभागांच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी आज विधिमंडळाच्या पायऱयांवर आंदोलन करून विरोधकांनी केली.

अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांनी विविध मुद्दय़ांसह राज्यात सुरू असलेल्या पेपरफुटीचा गंभीर प्रश्न घेऊन विधान भवनाच्या पायऱयांवर निषेध आंदोलन केले. दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत, पण सरकारला त्याचे काही पडलेले नाही, सरकारला पह्डापह्डीच्या राजकारणापासून वेळ मिळत नाही. राज्यातील परीक्षा घोटाळय़ावर श्वेतपत्रिका काढा. त्याचबरोबर राज्यातील पेपरफुटीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीच्या माध्यमातून घ्याव्यात, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. आंदोलनात सचिन अहिर, सुनील भुसारा, नरेंद्र दराडे, सतेज पाटील यांच्यासह विधान परिषदेतील सदस्य उपस्थित होते.

उद्योगमंत्री म्हणतात, तलाठी भरतीत पारदर्शकता

तलाठी भरतीची परीक्षा ही टीसीएस या संस्थेमार्फत झाली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. ही तलाठी भरती पारदर्शक आहे. याबाबतची लेखी माहिती अंबादास दानवे यांना देण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अर्थसंकल्पावर बोलताना दिली.