विजयी तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून नवीन चेहऱ्यांची निवड? सूत्रांची माहिती

भाजपनं मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यात विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहरे निवडू शकते. पक्षाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही निवड केली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. यानंतर पक्षाचे केंद्रीय नेतृत्व तीन राज्यांतील संभाव्य मुख्यमंत्रिपदावर चर्चा करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल साडेचार तासांची बैठक झाली, त्यामध्ये तीन राज्यांतील आघाडीच्या उमेदवारांचा विचार करण्यात आला. या बैठकीला पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा उपस्थित होते.

शहा आणि नड्डा यांनी संबंधित राज्यांच्या भाजपच्या प्रभारींसोबत नेत्यांबद्दल अभिप्राय गोळा करण्यासाठी घेतलेल्या बैठकांच्या मालिकेनंतर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आली होती.

भाजपचे केंद्रीय नेतृत्व लवकरच तीन राज्यांसाठी निरीक्षक नेमण्याची शक्यता आहे. हे निरीक्षक विधानसभेतील नेते निवडण्यासाठी तीन राज्यांतील नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकांवर देखरेख ठेवतील.

मध्य प्रदेशात, विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया आणि नरेंद्र सिंह तोमर आणि ज्येष्ठ राज्य नेते कैलाश विजयवर्गीय यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.

राजस्थानच्या सर्वोच्च पदासाठीही अनेक नावे चर्चेत आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सी पी जोशी आणि प्रमुख नेते दिया कुमारी आणि महंत बालकनाथ हे संभाव्य म्हणून पाहिले जात आहेत.

छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे दावेदार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष अरुणकुमार साओ, विरोधी पक्षनेते धर्मलाल कौशिक आणि माजी आयएएस अधिकारी ओ पी चौधरी हेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात आहेत.