मुंबई पोलिसांवर वैजापुरात हल्ला, पोलीस भरती घोटाळय़ाच्या तपासासाठी गेले होते

पोलीस पथकावर कुऱहाडीने जीवघेणा हल्ला करून त्यांच्या ताब्यातून आरोपी पळवून नेल्याची घटना तालुक्यातील संजरपूरवाडी येथे शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी 31 जणांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदींसह विविध कलमांन्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहिसर मुंबई पोलीस ठाण्याचे पथक बोगस पोलीस भरती प्रकरणात वैजापूर तालुक्यात आले होते. या पथकाने तालुक्यातील संजरपूरवाडी येथील दोन जणांना ताब्यात घेतले. या आरोपींना घेऊन जात असताना अर्जुन त्र्यंबकसिंग बमनावत यांच्या घरासमोर मोठा जमाव जमा झाला. त्यांनी पोलिसांची गाडी अडवली तसेच चिथावणी देऊन कुऱहाडीने पोलीस पथकावर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या ताब्यातील दोन आरोपींना पळवून नेले. याप्रकरणी 31 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.