
मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजपा सरकारला कायम आकस राहिला आहे. मुंबई व राज्याचे महत्त्व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले. आता मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून महाराष्ट्राला बरबाद करण्याच्या भाजपाच्या धोरणचाच भाग आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिकास्त्र डागले आहे.
नाना पटोले म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे शहर आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि येथील पोषक वातावरण लक्षात घेत जगभरातून गुंतवणूक येत असते. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क आणि आता टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. याआधी फडणवीस सरकार असताना मुंबईतल्या ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमधल्या गांधीनगरला हलवण्यात आले. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता यातील एक मोठा गट गुजरातला गेला. मुंबई व राज्यातील महत्वाची कार्यालये व प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आलेली आहेत. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, निरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रोंसाठीच काम करतात देशातील 140 कोटी जनतेसाठी नाही हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुल गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.