पुणे – मृत कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून मृतांच्या कुटूंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

पाच कामगारांचा मृत्यू

इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच कामगार ठार झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींच्या अंगात शिरलेल्या सळया कापून बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमी कामगारांना ससून आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.