30 लाख बेरोजगार फिरताहेत आणि 30 उद्योगपती देशाला लुटताहेत

ओदिशातील 30 लाखांहून बेरोजगार तरुण नोकऱयांसाठी इतर राज्यांमध्ये फीरत आहेत आणि 30 अब्जाधिश उद्योगपती देशाला लुटताहेत, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज बुधवारी मोदी सरकार आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यावर घणाघात केला. नवीन पटनायक सरकार केवळ उद्योगांना संरक्षण देण्याचे काम करत आहे असा आरोप करताना काँग्रेसचे सरकार या ठिकाणी आले तर बेरोजगारांना रोजगार मिळवून देईल असे आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिले. जीएसटीत सुधारणा करणे आणि छोटय़ा उद्योगांसाठी नवे आर्थिक मॉडेल तयार करणे हे आमचे प्रमुख ध्येय असेल, असेही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. खासगीकरणाला विरोध करून सरकारी नोकऱया उपलब्ध करून देण्यात येतील असेही ते म्हणाले.