हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा लढविणार – राजू शेट्टी

आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शाहूवाडीतील अंबा येथील अभ्यास शिबिरात केली.

राजू शेट्टी म्हणाले, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी अशा समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. आपण मांडलेला हमीभावाचा कायदा अजून प्रलंबित आहे. शेतकऱयांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.