
राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी अजून बराच कालावधी आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदेगट आणि मित्रपक्षात फूट पडल्याची चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभेला 288 पैकी भाजप 240 तर शिंदे गट 48 जागा लढेल, असे बावनकुळे म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर शिंदे गटातून आक्रमक प्रतिक्रिया आल्या. तसेच, भाजपचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना महादेव जानकर म्हणाले की, भाजपने जागा वाटप जाहीर केले आहे, त्यात आमचा विचार केलेला नाही. शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणूक लढणार असल्याचे दिसत आहे. आम्हाला सोबत घेण्याची भाजपाची इच्छा नसेल तर, आम्हीही त्यांच्या मागे जाणार नाहीत. आमच्या ताकदीवर 48 लोकसभा निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. सोबत घेतले तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
आपल्या चौकात आपली औकात वाढवली पाहिजे. आम्ही सध्या दोन आमदार आहोत. आमच्याकडे 98 जिल्हा परिषदा आहेत, तर तीन सभापतीदेखील आहेत. आसाम आणि कर्नाटकात एक-एक जिल्हा परिषद सदस्य आहे. गुजरातमध्ये माझे 28 नगरसेवक आहेत. चार राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाला मान्यता मिळाली आहे. जर भाजपला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही स्वतंत्र लढणार आहे,’ असेही ते म्हणाले.
भाजपाकडे आम्ही लोकसभेच्या पाच जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. जिथे आमची लढण्याची औकात आहे, तिथेच जागाच मागत आहोत. तो प्रस्ताव मान्य नसेल आणि त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर आघाडी करण्याचे ठरवले असेल, तर त्यांना शुभेच्छा आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष भाजपावर अवलंबून नाही. भाजपाला गरज वाटली, तर आम्हाला सोबत घेतील, अन्यथा आम्हाला आमचा रस्ता मोकळा आहे,’ असेही जानकर यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटासोसब इतर मित्रपक्षही नाराज असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप-शिंदे गट आणि मिक्षपक्षातील धूसफूस उघड झाली आहे.