आदित्य ठाकरे मतदारसंघात आल्याने बंडखोर घाबरले; राष्ट्रवादीचे टिकास्त्र

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सध्या शिवसंवाद यात्रेवर आहेत. ही शिवसंवाद यात्रा नाशिकमधून संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी शिंदे गटातील आमदार रेमश बोरनारे यांचा मतदासंघ असलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगाव इथे आदित्य ठाकरे यांच्या सभेत राडा झाला. सभेवर दगडफेक करण्यात आली. सभा संपवून निघताना आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले, याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत निर्माण करायचा हा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता शिंदे गटाच्या आमदारांनी अशा थराला पोचायला नको, हे दुर्दैवी आहे. शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी ही कृती केली आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा विरोधक गुद्दयावर येतात. आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघात आले याची भीती बंडखोर आमदारांच्या मनात असल्यामुळे दहशत पसरवणे, त्यांच्यावर दगडफेक करणे असा प्रकार केला आहे. ही नाकर्तेपणाची भूमिका आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला. महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नाहीत. पत्रकारांवर दबाव आणून पाहिजे त्या गोष्टी लोकांसमोर आणायच्या हा कावा सत्तारुढ पक्षाचा दिसतो. त्यामुळे पत्रकाराला चिरडून मारण्यात आल्याच्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीत एका पत्रकारावर गाडी घालून चिरडून मारल्याची घटना पत्रकारांनी विचारली असता जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नेहमी पाच आठवड्यांचे असते. मात्र आताच्या अधिवेशनात फक्त 17 दिवसांचे कामकाज होणार आहे. या अधिवेशनामध्ये सदस्यांना अधिक चर्चा करायला आणि काही गोष्टी विस्तारीतपणे मांडता याव्यात असा ठराव बुधवारी विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.