रोखठोक – राज्यसभा-विधान परिषदांची साठमारी; व्यापारी तागडीवरचे राजकारण

राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले. विधान परिषदाही होत आहेत. सहाव्या जागेवर भाजप जिंकला, पण तो विजय खरा आहे काय? 41 विरुद्ध 39 असा हा सामना झाला. पहिल्या पसंतीची सर्वाधिक 33 मते शिवसेना उमेदवाराने घेतली, पण विजय भाजपास मिळाला. केंद्रीय यंत्रणांनाही निवडणुकीच्या व्यापारी तराजूवर बसवण्याचे प्रकार या वेळी दिसले!

महाराष्ट्रासह देशभरात राज्यसभा निवडणुका पार पडल्या. दिल्लीतील सत्ताधारी पक्ष अशा निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करतो हे यानिमित्ताने पुन्हा दिसले. महाराष्ट्र आणि हरियाणात ते दिसले. राज्यसभा निवडणुकांची मांडवपरतणी सुरू असतानाच त्याच मांडवात विधान परिषदेचे 11 उमेदवार उभे राहिले आहेत. मतांचे गणित हाताशी नसताना भाजपने दोन जास्त उमेदवार उभे करावे याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत व महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे. राज्यसभा आणि विधान परिषदा मिळून किती कोटींचा धूर निघाला? (विधान परिषद व्हायची आहे, पण करेक्ट कार्यक्रम सुरू झाला आहे.) यावर पैजा लागल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्या. महाविकास आघाडीने तीन जागा जिंकल्या. सहाव्या जागेवर सहज विजय मिळेल इतके संख्याबळ दोन्ही बाजूला नव्हते. त्यामुळे त्या जागेसाठी काटय़ाची टक्कर झाली. कोल्हापूरचे धनंजय महाडिक भाजपचे व संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवारही कोल्हापूरचे. पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली. महाडिकांना ती 27 मिळाली, पण दुसऱ्या पसंतीच्या मतावर महाडिकांची संख्या 41 वर पोहोचली व पवार 39 वर. महाडिक विजयी झाले हे नक्कीच, पण संपूर्ण महाराष्ट्रात विजयाची रणशिंगे फुंकावीत व महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याचा ढोल वाजवावा इतके काही घडले नाही. वसई-विरारच्या ठाकुरांनी त्यांची तीन मते सरळ भाजपच्या पारडय़ात टाकली व अन्य पाच अपक्षांना आपल्याकडे वळविण्यात श्री. फडणवीस यांना यश आले. सहावी जागा व्यापारी व  बीओटी तत्त्वावर लढली गेली. दिल्लीत व्यापाऱ्यांचे राज्य आल्यापासून त्यांनी निवडणुका महाग तर केल्याच, पण निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू झाला. निवडणुका इतक्या महाग झाल्या की सामान्यांना आता निवडणुका लढण्याचा विचारही करता येत नाही. तरीही शिवसेनेने एक सामान्य कार्यकर्ता संजय पवार यास सर्व ताकदीनिशी उमेदवारी दिली व लढवले. धनशक्ती व केंद्रीय यंत्रणांपुढे त्यांना हार पत्करावी लागली! लोकशाही आणि क्रांतीची भाषा आपण नेहमी करतो, पण हे दोन्ही शब्द सध्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत. सोव्हिएत युनियनच्या क्रांतीचे एकेकाळी भारतीयांना कौतुक होते, ते आज राहिले नाही. कारण स्वतः पुतीन हे ऐयाशी व चंगळवाद्यांचे नेतृत्व करीत आहेत. सोव्हिएत क्रांतीचा खरा शिल्पकार स्टॅलिन मरण पावला तेव्हा त्याला सर्वात समर्पक श्रद्धांजली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अश्रूंनी वाहिली. स्टॅलिनच्या मृत्यूची बातमी कळताच डॉ. आंबेडकरांना हुंदका फुटला व अश्रू अनावर झाले. त्यांच्या अश्रूंचा खुलासा विचारताच डॉ. आंबेडकर म्हणाले, ‘‘एका चांभाराच्या मुलाने साऱ्या देशाचा कायापालट केला! माझ्या देशात असे घडू शकणार नाही म्हणून मला रडू येते.’’ 1953 सालची ही श्रद्धांजली आहे.

तरीही आपण मागेच!

स्टॅलिन हा एक चांभाराचा मुलगा होता तसे आजचे पंतप्रधान मोदी हे तर स्वतःच चहा विकून इथपर्यंत पोहोचले असे ते स्वतः सांगतात, पण रशिया-अमेरिकेच्या तुलनेत आपण आजही मागासलेले आहोत. कारण स्वातंत्र्याच्या क्रांतीशी आपला संबंध राहिलेला नाही व लोकशाही चवीपुरतीही उरलेली नाही. राज्यसभा निवडणुकीत लोकशाही मारण्यासाठी धनशक्तीचा कसा वापर होतो हे राजस्थानात  दिसून आले. एकदा हरयाणातून राज्यसभेवर जिंकून आलेले सुभाष गोयल यांना भाजपने राजस्थानात निवडणूक लढविण्यासाठी पाठविले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पाडावेत यासाठीच हा सर्व खेळ होता. पैशांचा प्रचंड वापर तेथे झाला, पण शेवटी झाले काय? लोकशाहीचा गाडा सुरळीत चालू द्यायचा नाही हे भाजपचे धोरण आहे. मंगळवारी मुंबईचा शेअर बाजार इतका घसरला की, अडीच लाख कोटींचा चुराडा झाला. व्यापार व उद्योगास चांगले वातावरण आज देशात नाही. काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे राबवली जात आहेत. अरब राष्ट्रांनी हिंदुस्थानी वस्तूंवर आणि व्यापाऱ्यांवर बहिष्कारच टाकला. कारण भाजपने देशात धर्मांधतेची जी विषवल्ली पेरली, त्यातून शेवटी प्रेषित मोहम्मद पैगंबरांवरच बदनामीची चिखलफेक भाजप प्रवक्त्यांनी केली. सर्व अरब राष्ट्रे त्यामुळे हिंदुस्थानच्या विरोधात उभी ठाकली. इस्लामी धर्मांध व दहशतवादी संघटनांना त्यातून बळ मिळेल व देशाची सुरक्षितता धोक्यात येईल. अल कायदासारख्या संघटनांनी आव्हानच दिले आहे, पण निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाला हे सर्व वातावरण हवेच असते. मोहम्मद पैगंबरांच्या अवमानानंतर कानपुरात दंगलीचा वणवा भडकला तेव्हा दिल्लीचे भाजपचे पुढारी व निवडणुकांचे मास्टर माइंड खुशीत आले. आपल्याला हवे तेच घडते आहे असे त्यांना म्हणायचे होते.

धर्माची फाळणी

हिंदू आणि मुसलमान अशी सरळ फाळणी आजच्या राज्यकर्त्यांनी आपल्या देशात केली आहे. पैगंबरांविषयी भाजप प्रवक्त्यांनी काढलेले उद्गार ही त्याच शाळेची शिकवणी आहे. लाखो कोटी रुपयांचा काळा पैसा आजही आपल्या राजकीय व्यवस्थेत खेळतो आहे. हा काळा पैसा ज्या मक्तेदार भांडवलशाहीतून निर्माण झाला ती मक्तेदारी मोडून काळा पैसा संपविण्याचे आश्वासन देऊन मोदी सत्तेवर आले, पण काळा पैसा आहे तसाच आहे. किंबहुना, काळा पैसा हेच भाजपचे बलस्थान बनले आहे. भाजपचे राज्य जेथे नाही तेथे ‘‘भ्रष्टाचार भ्रष्टाचार’’ म्हणून बोटे दाखवली जातात, पण प्रत्येक निवडणुकीत जे कोटय़वधी रुपये हे लोक उधळत आहेत तो पैसा कोठून आला? जिथून आला तिथे ते प्रहार कसा करतील? पैसा आणि जात-धर्म यांच्याच जोरावर निवडणुका लढवल्या जात असून आर्थिक कार्यक्रमाची कुणी चर्चाच करायला तयार नाही. ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे.

कोटी कोटींची भाषा

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे एक उमेदवार निवडून येण्यासाठी कोटी कोटींची भाषा करतात. काल ते वेगळय़ा पक्षात होते. तेथे भरपूर पैसे कमावले व भाजपमध्ये गेले. भाजप आज अशाच लोकांचा पक्ष बनला आहे. कोणी कसेही वागो, आपण आपल्या निष्ठांप्रमाणेच वागू हा लोकशाहीचा पहिला दंडक आहे. नैतिक आचरणाप्रमाणेच लोकशाहीचे आचरण बिनशर्त असते.

मतभेद हा लोकशाहीचा मूलाधारच आहे. सर्वांनी एकसारखीच मते बाळगावीत, अशी अपेक्षा असेल तर लोकशाहीचे नाव कशासाठी घ्यायचे? ज्यांचे मतभेद असतील त्यांच्याविषयी योग्य तो आदर फक्त  लोकशाहीतच राखला जातो. विशेषतः आपल्या देशातील ज्या ज्या थोर पुरुषांनी देशासाठी त्याग केला, कष्ट सोसले, उभी हयात व्रतस्थपणे लोकांच्या सेवेत वेचली त्यांच्याविषयी केवळ मतभेद आहेत म्हणून वाटेल ती विधाने करणे अथवा त्यांचा अवमान करणे हे लोकशाहीचे नाही, तर फॅसिस्ट मनोवृत्तीचेच लक्षण आहे. भ्रष्ट मार्गाने कोटय़वधी रुपयांच्या इस्टेटी जमा करणारेच नैतिकता व भ्रष्टाचारावर धडे देतात, हे उचित नाही. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांचे मुखवटे गळून पडले. विधान परिषद निवडणुकीत ते मुखवटे साफ फाटतील!

राज्य टिकेल काय?

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. गोपीनाथ मुंडे व पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, पण पंकजा मुंडे यांना एकटे पाडायचे असे भाजपचे धोरण दिसते. श्री. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व श्रीमती मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते. पैगंबरांचा अपमान करणाऱ्या नूपुर शर्मांना फडणवीस फोन करून ‘‘बेटी, चिंता मत करो!’’ असा धीर देतात तेव्हा आश्चर्य वाटते. ज्या नूपुर शर्मांच्या वक्तव्यामुळे देश दहशतवादी हल्ल्याच्या स्फोटकांवर उभा आहे, त्यांना एक नेता कसे काय पाठबळ देऊ शकतो? पंकजा मुंडे वाऱ्यावर आहेत व देशात अराजक माजवू पाहणाऱ्या नूपुर शर्मासारख्यांना भाजपचा राजाश्रय आहे.

राज्यसभा निवडणुकांचे निकाल लागले, पण भाजपचा विजयोत्सव आणखी काही दिवस सुरू राहील. शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी न दिल्याचे फळ त्यांना मिळाले, असे भाजप व श्री. फडणवीस यांच्यातर्फे सांगितले गेले. मग धनंजय महाडिकांच्या जागी भाजपने संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार बनवून राज्यसभेसाठी का विजयी केले नाही? हा माझा प्रश्न  आहे. सर्वच गोष्टींचे राजकारण व राजकारणाचा व्यापार करायचा हे त्यांचे धोरण. विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी तागडीवरच ठेवली आहे. केंद्रीय यंत्रणांची लाठी-काठी हातातून दूर केली तर भाजपकडे काय उरते?

त्यांचीही मूठ रिकामीच आहे! देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, पण या व्यापारी साठमारीत महाराष्ट्राला काय मिळाले?

 @rautsanjay61

[email protected]