
कोकणात प्रस्तावित असलेल्या राजापूर येथील रिफायनरीवरून पुन्हा रान पेटण्याची शक्यता आहे. बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाच्या जागेवर परप्रांतीयांनी मोठय़ा प्रमाणात जागा खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात समोर आले आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सचिव समीर शिरवाडकर यांनी ही सगळी माहिती माहितीच्या अधिकारात मिळवली आहे. या सगळ्याची माहिती देणारा एक ई-मेल शिरवाडकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे 16 मार्च रोजी पाठवला होता. त्यावर आपला ई-मेल अर्ज प्राप्त झाला असून पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे, असे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शिरवाडकर यांना देण्यात आले. या सगळ्या जमीन खरेदीच्या व्यवहारात राजकीय नेते, उच्चपदस्थ अधिकारी व परप्रांतीयांचा समावेश असल्याचा आरोप शिरवाडकर यांनी केला आहे.
राजापूर तालुक्यातीलच बारसू आणि सोलगावसह आसपासच्या गावामध्ये ही जमीन खरेदी केली गेली आहे. दरम्यान मागील दोन वर्षांमध्ये शेकडो एकर जमीन खरेदीचे व्यवहार याभागात झाल्याची बाबही माहिती अधिकारातून उघड आली आहे.
असे आहेत जमीन खरेदीदार
दुर्गा अनिल कुमार डोंगरे – 137 गुंठे, अखिलेश गुप्ता आणि नमिता गुप्ता – 92 एकर, आकांक्षा बाकाळकर – 113 गुंठे, धार्मिल झवेरी – 3 हेक्टर, सोनल शहा – 7.5 हेक्टर, विकेश शहा – 156 गुंठे, 7 ) निकेश शहा – 3 हेक्टर, रुपल शहा – 4 हेक्टर, अपर्णा शहा – 10 हेक्टर, देवेंद्र शर्मा – 4.5 हेक्टर, अनुराधा रेड्डी – 5 हेक्टर, सोनल शहा – 2 हेक्टर, श्रीकांत मिश्रा – 2 हेक्टर, देवेंद्र शर्मा – 6 हेक्टर, शशिकांत शहा – 4.5 हेक्टर, नरेंद्र सिसोदिया – 4.5 हेक्टर, काँग्रेसचे माजी आमदार आशीष देशमुख – 18 एकर.