संजय राऊत << [email protected] >>
कामाख्या देवीची यात्रा करून मुख्यमंत्री व त्यांच्या गटाचे आमदार परतले. जनावरांचे बळी देऊन नवस फेडण्यासाठी ते गेले होते हे आता जगजाहीर आहे. तो नवस काही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी नव्हता. फुटलेल्या चाळीस आमदारांची मर्जी सांभाळणे एवढेच काम मुख्यमंत्र्यांकडे दिसते. बाकी राज्यात नव्या ‘बाजीरावी’चेच चित्र दिसत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या शे-पाचशे लोकांसह आसाममधील कामाख्या देवीचे दर्शन करून आले. विमान व्यवस्था, लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था चोख असल्यामुळे आमदारांशिवाय इतर लोकही गेले. तीर्थयात्रा हेच राज्य सरकारचे मुख्य कार्य झाले आहे. हा विषय फक्त श्रद्धा आणि दर्शनापुरता मर्यादित राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या तीर्थयात्रेत त्यांच्या गटाचे चाळीस आमदारही होते व ते सर्व नवस फेडण्यासाठी आसामला गेले. नवस फेडण्यासाठी या सर्व लोकांनी प्राण्यांचे बळी दिले व त्याचे समर्थन महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय सदस्य करतात हे राज्याच्या परंपरेला साजेसे नाही. अंधश्रद्धेविरुद्ध बुलंद काम करणारे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, जोतिबा फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांशी बेइमानी करणारे हे कृत्य. ईश्वरावर श्रद्धा हवीच, पण त्या श्रद्धेचे अवडंबर किती माजवायचे व सत्ता कायम राहावी म्हणून ईश्वरास ‘बळी’ चढवून लाच का द्यावी? इसापने सांगितले ते महत्त्वाचे, ‘‘ईश्वराची भक्ती करावी, ती काळजीपूर्वक, मनापासून आणि पूज्यभाव हृदयात धरून करावी. तिच्यामध्ये ढोंग पिंवा बतावणी यांचा लवलेशही नसावा. देव आणि त्याचे सामर्थ्य म्हणजे केवळ मुलांना घाबरविण्यासाठी कल्पिलेला बागुलबुवा आहे असे समजू नये. देव सत्य, सर्वज्ञ आणि शक्तिमान आहे.’’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्यांच्या गटाच्या आमदारांना याचा विसर पडलेला दिसतो. इंदिरा गांधी या सगळय़ात जास्त धार्मिक होत्या, तरीही ईश्वर त्यांचा पराभव रोखू शकला नाही. इथे तर चाळीस आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली व ते आशीर्वाद घ्यायला आसामच्या तीर्थस्थानी पोहोचले.
यात्रेने प्रश्न सुटतील?
आसामातील तीर्थयात्रेने महाराष्ट्रापुढील प्रश्नांचे निर्दालन होणार आहे काय? ते महत्त्वाचे.
आधी प्रश्न कोणते ते पहा.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा सरळ अपमान केला. तरीही ते राज्यपालपदावर चिकटून आहेत. राज्यपालांचे काय करायचे? याबाबत सरकारने देवीला विचारणा केली काय?
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील दोन जिल्हय़ांवर दावाच सांगितला. बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी सीमा भाग राहिला बाजूला, उलट आणखी दोन जिल्हेही आमचेच, असे बरळणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध जनता संतापली, पण राज्यकर्ते थंड आहेत.
पोपट आबाजी जाधव या शेतकऱ्याने नगर जिल्हय़ात आत्महत्या केली. थकबाकी वसुलीसाठी महावितरणने त्यांची वीज तोडली. या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केली. अशा अनेक शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. कोणता देव या आत्महत्या थांबवणार!
महाराष्ट्रातून मोठे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवून नेले जात आहेत. लाखोंचा रोजगार त्यामुळे बुडाला व राज्याचे उद्योगमंत्री श्री. उदय सामंत हे त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन निघून जातात, पण गुजरात पिंवा कर्नाटकने महाराष्ट्राच्या बाबतीत जो अन्याय चालवला आहे त्यावर स्वाभिमानी भूमिका घेण्याची हिंमत आज एकाही मंत्र्यात दिसत नाही. सरकार इतके बुळचट का झाले आहे?
देवेंद्र फडणवीस हे सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर मनापासून समाधानी आहेत काय? या प्रश्नाचे उत्तर आज श्री. फडणवीस यांना मानणारेही नीट देणार नाही. हे सरकार फडणवीस यांच्यावर लादले आहे व भाजपचे मंत्री मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना मानायला तयार नाहीत. यापुढे भाजपच्या मोठय़ा गटाचे भांडण शिवसेनेशी राहणार नसून ते शिंदे व त्यांच्या गटाशी राहील व त्याच अंतर्विरोधातून सध्याची व्यवस्था कोलमडून पडेल.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केले व पाठोपाठ कन्नड रक्षण वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत घुसून हैदोस घातला. जत तालुक्यात त्यांचे झेंडे लावले व महाराष्ट्राचे सरकार हे सर्व बघत राहिले! महाराष्ट्रात असे कधीच घडले नव्हते. येथे महाराष्ट्राचा स्वाभिमान व शौर्य पायदळी तुडवले जात आहे!
हतबल मुख्यमंत्री!
मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत आहेत. श्री. फडणवीस यांनाही ते मानायला तयार नाहीत. कारण शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले? सीमा प्रश्न हा भावनिक व अस्मितेचा विषय आहे. 30 तारखेस सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नी सुनावणी होणार म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे दोन दिवस आधीच दिल्लीत ठाण मांडून बसले व तेथे बसून पत्रकारांशी संवाद साधत होते. या काळात आपले मुख्यमंत्री कोठे गायब होते? महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नात तर त्यांची खरी कसोटी लागणार आहे. दिल्लीच्या नाकर्तेपणाचे सर्व ओझे आता त्यांच्या खांद्यावर येईल; कारण ‘सीमा प्रश्नासाठी आम्ही चाळीस दिवस बेळगावच्या तुरुंगात होतो,’ असा डांगोरा त्यांनीच पिटला आहे. त्यामुळे ते आता काय करणार? चंद्रकांत पाटील व शंभू राजे देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार? हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल. कर्नाटकात आज भाजपचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत. शिंदे यांना फार लोकप्रियता व यश लाभू द्यायचे नाही असे एपंदरीत धोरण आहे. चाळीस आमदारांना जपायचे एवढेच मुख्यमंत्र्यांचे काम आहे. मंत्रालयात पैशांच्या मोठय़ा उलाढाली सुरू आहेत. त्या उलाढाली एक दिवस अंगलट येतील व सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाहीत, असे भाजपवालेच सांगतात. कामाख्या देवीचे नवसही अशा वेळी कामी येणार नाहीत, हेच खरे!
भाषणांचे वाचन!
श्री. एकनाथ शिंदे यांचे मान खाली घालून भाषण वाचन सुरू झाले की अगदी नको वाटते, असे लोक सांगतात. पुन्हा त्यांचे खासदार चिरंजीव हेच त्यांच्यासोबत कायम असतात. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार या मंडळींना नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात गर्दी असते व ते त्या गर्दीत जाऊन लोकांच्या कागदावर सहय़ा करतात. याचे काwतुक त्यांचेच लोक करतात, पण मुख्यमंत्र्यांनी सहय़ा केलेल्या त्या कागदाचे पुढे काय होते हेसुद्धा समजून घेतले पाहिजे. चाळीस आमदारांना महाराष्ट्रातील रस्ते, बांधकाम, पालिकेचे ठेके हवे आहेत. ते मिळत आहेत. गेल्या तीन महिन्यांत मुंबई-ठाणे महानगरपालिकेत नेमके काय व्यवहार झाले व मलई कोठे गेली व ती किती हजार कोटींची होती? याचे स्वतंत्र ऑडिट व्हायला हवे. मुख्यमंत्र्यांच्या घरातूनच हे सर्व आदेश दिले जातात. हे खरे मानले तर श्री. फडणवीस हे सर्व ओझे कसे पेलणार? हा प्रश्नच आहे.
आम्ही हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना सोडली असे शिंदे व त्यांचे लोक सांगत होते, पण शिवरायांचा अपमान होऊनही यांचे हिंदुत्व अजगराप्रमाणे झोपून राहिले व हिंदुत्वाचे ढोंग उघडे पडले. आधी राज्यपाल कोश्यारी, नंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व आता महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा. रोज अपमानास्पद वक्तव्ये सुरू आहेत. लोढा यांनी तर शिंदे यांच्या ‘पलायना’ची तुलना शिवरायांच्या आग्र्याहून सुटकेशी केली. नवा इतिहास लिहिला जात आहे. सरकार दाढीवर हात फिरवत मजा घेत आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विषय शिंदे यांनी काढला, पण कर्नाटकचे लोक सांगलीत घुसले तरी यांच्या स्वाभिमानाने हालचाल केली नाही! कारण सगळेच जण दांडगाई व खुषामतखोरीत मग्न आहेत. लोकहितवादींनी दिलेला एक संदर्भ देतो व विषय संपवतो. ‘‘बाजीरावीत सौदेगिरी फार माजली. त्यावेळेस उनाड लोक शेंडी, संजाबदार, पागोटे पंगणीदार, जोडा अणीदार, अंगरखा कळीदार, मिशा पिळदार, धोतरे चुणीदार, भोवया कमानदार, गंध साखळीदार आणि छाती गोलदार अशी ढोंगे करू लागले. पूर्वीचा साधेपणा गेला.’’
आज त्याच ‘बाजीरावी’चे नवे रूप महाराष्ट्रात दिसू लागले आहे!