आमदार अपात्र ठरतील, सरकार पडेल, नवे सरकार येईल या गोष्टी राजकारणात घडत असतात. पण उद्या सर्वोच्च न्यायालयात देशाच्या भविष्याचा फैसला होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. निकाल आमच्या बाजूने लागेल असे म्हणत नाही, पण संविधानाचा, कायद्याचा विजय व्हावा. या देशात कायदा, संविधान उरले असेल, न्याययंत्रणेवर कुणाचाही दबाव नसेल तर उद्या न्याय होईल, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले की, या देशात लोकशाही आहे की नाही? हा देश विधानसभा आणि संसदेनुसार काम करतेय की नाही? न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की कुणाच्या दबावाखाली काम करतेय? याचा फैसला उद्या होईल.
नरहरी झिरवळांनी दिलेला निर्णय विसरलात का?
आमदारांच्या निलंबनाचा अधिकार मलाच आहे असे वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले होते. त्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल कुणी असे म्हणत असेल याचा अर्थ त्यांनी काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केला. पण मला अजूनही खात्री आहे की, या देशाचे सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे. विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष काय म्हणतात याला अर्थ नाही. त्यावेळी विधानसभेच्या अध्यक्षपदी घटनात्मक व्यक्ती म्हणून नरहरी झिरवळ बसले होते. त्यांनी एक निर्णय दिला होता हे सर्वजण विसरत आहेत. त्यांनी निर्णय दिल्यानंतरही सरकार स्थापन झाले होते. त्यांनी 16 आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यांचा निर्णय योग्य होता हे मला वाटते.