… तर मंत्रालयात उपोषण करू; रोहित पवार यांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 298 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, आता लवकरच या शहराचे नाव अहिल्यानगर होईल, अशी आशा सर्वांना आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. तसेच आता त्यांनी शिंदे- फडणवीस सरकाला कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांवरुन इशारा दिला आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना काढण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. ही तारीख उलटून गेली तरी सरकारने अधिसूचना काढली नाही. आता, राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत (26 जून) वाट पाहू आणि तरीही अधिसूचना काढली नाही तर आधी जाहीर केल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसह मंत्रालयात उपोषण करून जनतेची ताकद दाखवून देऊ, असा इशारा रोहित पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना इशारा दिला आहे.

रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी संदर्भात अधिसूचना काढण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे यांसदर्भात स्मरणपत्रही दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात येथील एमआयडीसीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, इतर तांत्रिक बाबीबी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे, आश्वासनानुसार महायुती सरकारने अधिसूचना काढावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती. तसेच, राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नसल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. त्यामुळे, आता पुढील तारीख देत रोहित पवार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.