‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांची करमणूक करत आहे. मात्र गेल्या काही वर्षात या मालिकेला अनेक कलाकारांनी रामराम केला आहे. या यादीत आता जेठालाल गडा याचा मुलगा टिपेंद्र उर्फ टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट यानेही चाहत्यांना धक्का देत मालिका सोडली आहे.
राज अनादकट ही मालिका सोडणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. परंतु राज या सर्व अफवा असल्याचे म्हणत होता. आता मात्र त्याने स्वत:च ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडत असल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली आहे.
सर्व अनुमान आणि प्रश्नांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोबतचा माझा करार अधिकृतपणे संपला आहे, अशी माहिती राज अनादकट याने दिली आहे. मी खुप काही शिकलो, मित्र बनवले. ही कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष होती. या प्रवासात माझी साथ देणाऱ्यांचे धन्यवाद. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची संपूर्ण टीम, माझे मित्र, कुटुंब आणि तुम्हा सर्वांचे खुप आभार. तुम्ही सर्वांना टप्पूच्या रुपात मला स्वीकारले, प्रेम दिले. तुमच्या पाठिंब्यामुळेच चांगले काम करण्याची हिंमत मला मिळाली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या टीमला आणि मालिकेला भविष्यासाठी ऑल द बेस्ट, असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
View this post on Instagram
दरम्यान, राज अनादकट याने काही दिवसांपूर्वी रणवीर सिंह याच्यासोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे म्हटले होते. अर्थात ते स्वप्न काय याचा खुलासा त्याने केला नव्हता. परंतु तो रणवीरसोबत आगामी चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच त्याने मालिकेलाही रामराम केल्याने या शक्यता बळावल्या आहेत.
राज अनादकट ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत टिपेंद्र उर्फ टप्पू गडाची भूमिका साकारत होता. 2017मध्ये भव्य गांधीने ही मालिका सोडल्यापासून तो ही भूमिका करत होता. गेल्या पाच वर्षात त्याने आपल्या दमदार अभियनाने प्रेक्षकांचे मन जिंकले. मध्यंतरी बबिता उर्फ मूनमून दत्तासोबत त्याच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या.