
उत्तर प्रदेशातील रेल्वेच्या लखनऊ विभागाने मागील तीन वर्षात उंदीर पकडण्यासाठी तब्बल 69 लाख रुपये खर्च केले आहेत. लाखो रुपये खर्च करून या मंडळाने तीन वर्षात केवळ 168 उंदीर पकडले आहेत. म्हणजेच एक उंदीर पकडायला सुमारे 41 हजार रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेल्या माहितीत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर प्रदेश सरकारला जबरदस्त टोला लगावला आहे. त्यांनी ‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने 3 वर्षांत 69 लाख रुपये खर्च करून 168 उंदीर पकडले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. एक उंदीर पकडायला 41 हजार रुपये खर्च करणाऱ्या सरकारला गणपती बाप्पा सुबुद्धी देवो, असा टोला त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला लगावला आहे.
उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागाने रेल्वे स्थानकावर फिरणारे उंदीर पकडण्यासाठी एकूण 69 लाख रुपये खर्च केले. विशेष म्हणजे 69 लाख रुपये खर्च करून त्यांना केवळ 168 उंदीर पकडण्यात यश आले. एक उंदीर पकडण्यात सुमारे 41 हजार रुपये खर्च केले. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) माहिती मागवल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. नीमच येथील रहिवासी असणारे आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकाराखाली रेल्वेने उंदीर पकडण्यासाठी किती रक्कम खर्च केली? याची माहिती मागितली होती. उत्तर रेल्वेतील दिल्ली, अंबाला, लखनऊ, फिरोजपूर आणि मुरादाबाद अशा 5 विभागांनी उंदीर पकडण्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती दिली. लखनऊ विभागानेही याबाबतची माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी 69 लाख रुपये खर्च करून केवळ 168 उंदीर पकडल्याची माहिती दिली.
2020 मध्ये उंदीर पकडण्यास सुरुवात झाली होती. उंदीर पकडण्याचं कंत्राट ‘सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन’ला दिले होते. या कंपनीने पहिल्या वर्षी 83 उंदीर पकडले. त्यानंतर उंदीर पकडण्याचा सरासरी वेग कमी झाला. 2021 मध्ये फक्त 45 उंदीर पकडले. तर 2022 मध्ये 40 उंदीर पकडले. त्यामुळे एक उंदीर पकडण्यासाठी 41 हजाराचा खर्च झाला.