WTC Final – यशस्वी जयस्वालला लागली लॉटरी, थेट टीम इंडियामध्ये झाली एन्ट्री

आयपीएलच्या 16व्या हंगामामध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना खोऱ्याने धावा काढणाऱ्या यशस्वी जयस्वालला लॉटली लागली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. ऋतुराज गायकवाड याच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

ऋतुराज गायकवाड याची राखीव खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये निवड झाली होती. मात्र याच 2 ते 3 जून दरम्यान त्याचे लग्न असल्याने तो इंग्लंडला रवाना होऊ शकणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी आता यशस्वीला संधी मिळाली आहे. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल 7 ते 12 जून दरम्यान खेळली जाणार आहे.

टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर यशस्वी जयस्वाल याने लाल चेंडूवर सराव सुरू केला आहे. रविवारी सकाळी बॉम्बे जिमखाना येथे तो लाल चेंडूने सराव करताना दिसला. त्याच्याकडे आधीपासूनच इंग्लंडचा व्हिसा असल्याने तो आज रात्रीच लंडनला रवाना होईल. तिथे तो लंडनला पोहोचलेल्या विराट कोहलीसह अन्य खेळाडूंसोबत सरावात सहभागी होईल.

दरम्यान, 21 वर्षीय यशस्वी जयस्वाल याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड दमदार आहे. प्रथम श्रेणीच्या 15 लढतीत त्याने 80 च्या सरासरीने 9 शतक आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने 1845 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात रणजी स्पर्धेत मुंबईकडून खेळाडूने 45च्या सरासरीने 404 धावा केल्या. तसेच आयपीएल 13 मध्ये त्याने 48च्या सरासरीने 625 धावा चोपल्या. यात त्याच्या शतकाचाही समावेश आहे. मुंबईविरुद्ध वानखेडे मैदानावर त्याने ही खेळी साकारली होती.