
>> रविप्रकाश कुलकर्णी
इंदिरा गांधींनी ‘आणीबाणी’ नावाचा वरवंटा उगारला आणि त्याखाली भले भले भरडले गेले. सुदैवाने या जुलमी एकाधिकारशाहीला लोकशाहीची चाड असणाऱयांनी प्राणपणाने झुंज दिली आणि जणु या दुसऱया स्वातंत्र्य युद्धात विजय मिळवला.
या स्वातंत्र्य युद्धात लढणाऱयांपैकी एक विनय हर्डीकरदेखील होता. आणीबाणीला ज्यांनी विरोध केला, ज्यांना कारावास भोगायला लागला, ससेहोलपट झाली, जुलुमाला तोंड द्यायला लागले, अनन्वित अत्याचार झाले अशांपैकी काहींनी आपले अनुभव प्रसिद्ध केले. काहींची पुस्तकेदेखील प्रकाशित झाली. अशा प्रकारच्या पुस्तकांची तेव्हा एक लाटच आली होती. अर्थात त्यात डावं-उजवं होणं अपरिहार्यच. त्यात ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे उजवं पुस्तक होतं, पण ‘जनांचा प्रवाहो चालला’ एकदम प्रकाशात आलं एका प्रकरणामुळे!
महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार योजनेत हर्डीकर आणि अर्थातच त्यांचं पुस्तक ‘जनांचा प्रवाहो चालला’चा अंतर्भाव होता.
पण झालं भलतंच.
पुरस्कार मिळालेल्या यादीमधील तीन पुस्तकांना पुरस्कार नाकारण्यात आला. ती पुस्तके होती 1- ब. ना. राजहंस यांचं ‘जयप्रकाश नारायण’, 2 – अरुण साधू यांची ‘सिंहासन’ ही कादंबरी आणि विनय हर्डीकर यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ अर्थात सरकारच्या या मनमानी कारभाराचा सर्वत्र निषेध झाला. य. दि. फडके यांनी तर त्यांना मिळालेला पुरस्कार सरकारला परत करून आपला निषेध नोंदवला. त्या वेळी ‘पुरस्कार वापसी’ वगैरे शब्द आलेला नव्हता. झाल्या प्रकाराने राजहंस काय किंवा साधू काय, ही नावं परिचित होती, पण हर्डीकर म्हणजे कोण? असं कुतूहल निर्माण झालं. जाणत्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं. शिवाय यदुनाथ थत्ते, श्री. ग. माजगावकर, दुर्गाबाई भागवत आदींनी या पुस्तकांना स्वतंत्रपणे स्वाभिमान पुरस्कार द्यायचं ठरवलं. ना. ग. गोरे यांच्या हस्ते पुरस्कार सोहळादेखील झाला.
दुसरी आवृत्ती मात्र 1978 मध्ये संजय प्रकाशन यांनी काढली. (पहिली राजहंसची) विनय हर्डीकर नावाने तेव्हापासून लक्ष वेधलं. मग कित्येक वर्षांनंतर त्यांचं ‘श्रद्धांजली’ पुस्तक आलं. या पुस्तकाने माझ्या मनाचा कब्जा घेतला. यातील मृत्युलेखाचं शीर्षकही विलक्षण होतं. त्यात जसा उमाळा होता तेवढाच परखडपणा पण होता. स. शि. भावेंवरचा लेख तर अप्रतिम. किंबहुना तो एकमेव म्हणावा असा आहे. त्यात ठसके बसावे असे अनेक तपशील आहेत. त्यातला एक पहा, ‘जनांचा प्रवाहो चालला’ला खरं तर आधी स.शि.भावे यांची प्रस्तावना असणार होती, पण ते बारगळलं. मग त्यांनी ब्लर्ब लिहिला, ‘कलाकृतींचे संदर्भ…मुक्तता लाभलेली कादंबरी’.
पुढे हर्डीकर म्हणतात, “असं खास गुगली वर्णन करून त्यांनी आमची पंचाईत करून ठेवली. पुढे माजगावकरांनी या गोलमाल वाक्याचा उपयोग ‘जनांचा प्रवाहो…’च्या जाहिरातीसाठी सुरू केला. बहुधा त्यामुळेच पहिली आवृत्ती संपायला वेळ लागला असावा.’’ हीच हर्डीकरी खासीयत त्यांच्या सगळ्या लेखनाचा स्थायिभाव आहे, शक्ती आहे.
त्यामुळे हर्डीकरांची नंतरची पुस्तकं वाचणं अपरिहार्य झालं. विनय ज्ञान प्रबोधिनी, ग्रामायण, इंडियन एक्स्प्रेस, शरद जोशींची शेतकरी संघटना अशा वेगवेगळ्या मांडवांखालून गेला, पण तिथे न पटल्याने बाहेरदेखील पडला. एवढं होऊनसुद्धा हा माणूस निराश नाही झाला की फ्रस्टेट. तरीसुद्धा उमेद टिकून राहिलेला, आशावादी. ते त्याच्या लेखनातून दिसलं.
अशा खट्टय़ामिठय़ा प्रसंगी झटका देणाऱया या माणसावर प्रेम करणारे आहेत. म्हणून तर 24 जून 2024 रोजी विनयच्या पंचाहत्तरीला या दुर्मीळ स्वभावाच्या माणसाला अभिवादन करण्यासाठी माझ्यासारख्यांनीही गर्दी केली. त्यासाठी संयोजन समिती तयार झाली! त्यानुसार गाण्याचे, चर्चेचे कार्यक्रम झाले. त्यातल्या एका कार्यक्रमाची मला खूपच उत्सुकता होती. त्याचे एक संयोजक डॉ. राजीव बसर्गेकर यांच्या शब्दांत, “संयोजन समितीच्या सुरुवातीच्या एका बैठकीमध्ये एक खूप छान कल्पना निघाली. लपवायचं कशाला, विनयनेच काढली. जशी विनयला 75 वर्षे पूर्ण झाली तशीच भारतीय प्रजासत्ताकालाही 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पिढीतल्या म्हणजे 1947 ते 1962 या वर्षांमध्ये जन्माला आलेल्या आणि निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये मनापासून काम करून ते क्षेत्र वाढतानाही पाहिले, त्या क्षेत्रामध्ये स्वतचा ठसा उमटवणारे काम केले, अशा अनुभवी व्यक्तींना विनंती करून त्या क्षेत्रातील प्रगती आणि त्या व्यक्तीने केलेले काम यावर आधारित त्यांचे लेख मिळवावेत, त्यांचा संग्रह प्रसिद्ध व्हावा.’’ संयोजन समितीची उस्तवार सफल झाली. 35 जणांच्या अनुभवामृताचा हा लेखसंग्रह ‘विनय हर्डीकर अभिनंदन ग्रंथ’ म्हणून देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. यांच्यातर्फे प्रकाशित झालेला आहे. अर्थात ते वाचण्याची उत्सुकता आहे.