सरकारकडून जनतेला मदतीची अपेक्षा राहिली नाही, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची टीका

राज्य सरकारच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. शेतकऱ्यांची जुनीच देणी सरकारने दिलेली नाहीत. सन 2023 व 24 मधील खरीप हंगामातील विम्याचे पैसे अजून दिलेले नाहीत. सरकारकडे तिजोरीत पैसे नसल्यामुळे सरकार पैसे देत नसल्याने सरकारकडून जनतेला मदतीची अपेक्षा राहिली नसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत केली.

पत्रकारांच्या प्रश्नाला पुढे उत्तर देताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळाला पाहिजे. त्यांना 56 टक्के ऐवजी शंभर टक्के पगार मिळालाच पाहिजे. पगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी व मिंधे गट श्रेयवाद घेत असल्याचेही चुकीचे आहे

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत मागच्या काळात भाजपमधील काही मंडळींनी आंदोलने केली होती, पण आता मात्र त्यांचे सरकार असताना व एसटी कर्मचाऱ्याचे पगार झाले नसताना या प्रश्नावर न बोलत्ता ही मंडळी कोणत्या बिळात जाऊन बसली आहेत? अशी टीका अंबादास दानवे यांनी यावेळी केली.

‘एफबी’ म्हणजे ‘गद्दार बाबुराव’ पेक्षा कधीही ‘फुकटचा बाबुराव झालेला बरा’, अशी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता अंबादास दानवे यांनी टीका केली. तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र माहूर या तीर्थक्षेत्राचा म्हणावा तसा विकास झालेला नसून राज्य सरकारने जाहीर केलेले प्राधिकरणही रद्द केले आहे. नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. शक्तिपीठ मार्ग करण्यावरून सरकार आग्रही असले तरी आहे ते रस्ते दुरूस्त करा. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केली.