धक्कादायक… भाईंदरमध्ये 163 बालके कुपोषित; नऊ मुले ‘सॅम’ तर 152 मुले ‘मॅम’ गटात

>> इरबा कोनापुरे

मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर शहरात कुपोषणाने फास आवळला आहे. मीरा-भाईंदरमधील तब्बल 163 बालके कुपोषित असून त्यातील नऊ मुले अतितीव्र कुपोषित तर 152 मुले मध्यम कुपोषित गटात असल्याची नोंद झाली आहे. गंभीर बाब म्हणजे यात किती आदिवासी बालके आहेत याची आकडेवारीच एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडे नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वातानुकूलित कार्यालयात बसून कारभार हाकताना आदिवासी पाड्यांवर जाऊन बालकांची आणि त्यांच्या मातांची नोंदच करत नसल्याचा आरोप मीरा-भाईंदरमधील आदिवासींनी केला आहे.

मीरा-भाईंदर शहरात चेना, काजुपाडा, काशीगाव, माशाचा पाडा, घोडबंदर, वरसावे, मीरे असे आदिवासी पाडे आहेत. यातील अनेक पाडे हे आजही समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. या आदिवासी पाड्यांवरील बालकांच्या जन्म-मृत्यूची, त्यांच्या आहाराची आणि प्रकृतीची नोंद एकात्मिक बालविकास विभागामार्फत ठेवली जाते. या विभागाच्या झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी मीरा-भाईंदरमध्ये १६३ बालके कुपोषित आहेत. त्यातील किती बालके आदिवासी आहेत असा सवाल विचारण्यात आला, त्यावेळी मात्र या विभागाच्या अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. नेमके किती आदिवासी बालके कुपोषित आहेत हे या अधिकाऱ्यांना सांगता आले नाही.

आदिवासी पाडे अधिकाऱ्यांच्या खिजगणतीतच नाहीत
मीरा-भाईंदरमधील आदिवासींच्या ताब्यात असलेल्या सरकारी जमिनीवरील त्यांची किती घरे अधिकृत केली, किती आदिवासी पाड्यांवर वीज कनेक्शन आहे याची माहिती अधिकाऱ्यांना सांगता आली नाही. आदिवासींसाठी पक्क्या घरांची सुविधा, नळपाण्याचे कनेक्शन आणि कुठल्या पाड्यावर किती पक्के रस्ते आहेत असा प्रश्न विचारल्यावर अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. आदिवासींच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेला एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग, आदिवासी विभाग आणि महापालिका यांचा एकमेकांशी कोणताही ताळमेळ नाही काय, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला तेव्हा यापुढे योग्य कार्यवाही करू असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

कुपोषित बालकांच्या मुद्द्यावर येत्या मंगळवारी सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलावली आहे. त्याचबरोबर भाईंदर येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात बंद असलेले पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे. वर्षातून दोन वेळा मुलांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत.

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार करणार
गेल्या एक महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात मीरा-भाईंदर शहरात 152 कुपोषित तर नऊ अतिकुपोषित बालके असल्याची माहिती ठाणे जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी मीरा-भाईंदर (नागरी) गणेश जाधव यांनी दिली. या कुपोषित मुलांना योग्य पोषण आहार मिळावा तसेच त्यांच्यावर तातडीचे उपचार व्हावेत यासाठी त्यांच्यावर पंडित भीमसेन जोशी रुग्णालयामार्फत उपचार करण्यात येतील असेही जाधव यांनी सांगितले.
– डॉ. संभाजी पानपट्टे (अतिरिक्त आयुक्त, महापालिका)